मुंबई – करोनाच्या विषाणूशी लढताना आपल्याला दोन वर्षे झाली आहेत. या काळात आपण संसर्गाचा मोठ्या दोन लाटा अनुभवल्या आणि काळजीपूर्वक पाऊलं उचलत त्या रोखल्या सुद्धा. मात्र आता आपलं रूप बदलून आलेल्या विषाणूच्या संसर्गाचा वेग खूप जास्त आहे. या काळात राज्यातील आरोग्य सुविधा आणखी बळकट करण्यावर भर असले, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले, या संसर्गाला लवकरात लवकर थोपवणे गरजेचे आहे, अन्यथा आपल्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येऊ शकतो. याचमुळे वारंवार टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधितांशी विचार विनिमय करून आपण राज्यात काही निर्बंध लावण्याचे ठरविले आहे.
केवळ कायदे आणि नियम करून अशा आव्हानांचा मुकाबला होऊ शकणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने आता ही लढाई अंतिम आहे आणि हा शेवटचा घाव करोनावर करायचाच अशा निश्चयाने आरोग्याचे नियम पाळावे. आपल्याला काम बंद करायचे नाही, तर गर्दी कमी करायची आहे.
राज्य सरकारने “ब्रेक दि चेन’ आणि “मिशन बिगीन अगेन’च्या माध्यमातून वेळोवेळी नियमावल्या अंमलात आणल्या. नियम पाळलेच पाहिजेत अन्यथा संबंधितांवर कडक कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
आपण शाळा-महाविद्यालये परत ऑनलाईन सुरू केली आहेत. शिक्षण थांबणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळे आपल्याला मिळालेली ही सुट्टी आहे असं समजून इकडे-तिकडे अनावश्यक फिरून करोनाचे दूत बनू नका, असेही आवाहन त्यांनी केले.
लसीकरण फार आवश्यक
करोनाशी लढता देताना लसीकरण फार आवश्यक आहे. अजूनही लस घेतली नसल्यास लगेच घ्या. आज या विषाणूची तीव्रता आपल्याला जाणवत नसेल किंवा मृत्यू दर कमी असेल तर तो केवळ लसीकरणामुळे आणि सतत मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सवयीमुळे आहे हे लक्षात ठेवा. काही जिल्ह्यांत लसीकरण झालेले नाही, तिथं रुग्ण संख्या अधिक वाढू शकते. त्यामुळे लसीकरण कमी असलेल्या जिल्ह्यांच्या बाबतीत निर्बंध अधिक कठोर करण्याचा पर्याय देखील सरकारकडे असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.