राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
इस्लामपूर – पायाभूत सुविधांच्या बरोबर पूर्वी दुर्लक्षित राहिलेल्या आरोग्य सेवेकडे आतां सर्वाधिक लक्ष द्यावे लागेल हे कोविडच्या महामारीने हे सिद्ध झाले आहे. राज्यातील आरोग्यसेवा आतंरराष्ट्रीय दर्जाची अन् कार्पोरेट करण्यावर भर असेल. येत्या काही दिवसांत आरोग्य विभागात मेरिटने १७ हजारांची भरती होईल. संकटाचा सामना करण्यासाठी शासकीय रुग्णालयात सर्व यंत्रणा अद्ययावत व प्रशिक्षित मनुष्यबळाची असेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ते म्हणाले ,” कोरोना काळात सेवा देणाऱ्या खाजगी डॉक्टरांना देखील ५० लाखांचे विमा कवच मिळेल. त्यामुळे आयएमएच्या डॉक्टरांनी मनामध्ये भीती न बाळगता सक्रिय व्हावे.”
येथील उपजिल्हा रुग्णालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने आठ कोटी रुपये खर्चून टाटा ट्रस्टच्या मदतीने उभारलेल्या अद्यावत कोविड हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळाप्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते. राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंग नाईक, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डूडी, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा प्रमुख उपस्थित होते.
मंत्री राजेश टोपे म्हणाले, “लोकशाही आघाडीचे सरकार प्रामाणिकपणे लोकहिताचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. लस येईपर्यंत आपणाला मास्क, सॅनिटायझर वापरत कोरोनासोबत जगावे लागणार आहे, त्यामुळे याचे दर नियंत्रित करणार आहोत. कोरोनाच्या महामारीत कुणाकडेही दुर्लक्ष होणार नाही. ट्रेसिंग आणि अलगिकरण महत्त्वाचे आहे. टेस्टिंग करण्यात कमी पडू नका. आपणाला मृत्युदर एक टक्क्यांच्या खाली आणायचा आहे. तपासणी वाढवून नियंत्रण आणणे शक्य आहे. मुंबई, मालेगावात त्याचा चांगला अनुभव आला आहे. कुणालाही लक्षण दिसले तर हयगय करू नका. अंगावर काढू नका, ताबडतोब रुग्णालयात दाखल व्हा.”
ते म्हणाले ,” इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयाचा चेहरा मोहरा पूर्ण बदलला आहे. सरकार आणि आरोग्य विभाग टाटा ट्रस्टचे ऋणी आहे. कारण या निधीव्यतिरिक्त पुणे, मुंबईत व्हेंटिलेटर, पीपीई कीट, रुग्णवाहिका, मास्क यासाठी टाटांनी मोठी मदत दिली आहे. मराठवाडा भागातही जालना, अंबड परिसरात अशा सुविधेची मदत अपेक्षित आहे. जयंत पाटील आणि आमचे विश्वासाचे नाते आहे. त्यांनी या भागात चांगले नियंत्रण प्रस्थापित केले. आपणाला दूरदृष्टी असलेले नेतृत्व लाभले आहे. या सेंटरसाठी त्यांनी बेस्ट डॉक्टर्स द्यावेत. सरकार लागेल ती मदत करेल. यापूर्वी आरोग्य विभाग दुर्लक्षित राहिला होता, परंतु, आता त्यावरील खर्च वाढण्याला प्राधान्य राहील. विकसित देशात आरोग्य सुविधा महत्त्वाच्या असतात, कोरोनाने आपणाला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे शिकवले आहे. सरकार अत्यंत अद्यावत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आग्रही आहे. लोकांना झळ पोहोचू नये, असे दूरगामी निर्णय घेतले जात आहेत. खासगी रुग्णालये ताब्यात घेत आहोत, जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणारे अधिकार, मोफत रुग्णवाहिका, पोलीस कर्मचाऱ्यांना ५० लाखाचा विमा हे महत्त्वाचे निर्णय घेतलेत.”
* यापुढे सॅनिटायझर, एन 95 मास्क किंव्हा कोणतेही प्रकारचे मास्क एका ठराविक किमतीतच विकावे लागेल, या बाबत ४ दिवसात निर्णय घेतला जाईल.
* महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील १ हजार हॉस्पिटलमध्ये जनतेला मिळणार कॅश लेस सेवा.
* आरोग्य विभागात १७ हजार जागा मेरिटने भरणार.
* कोरोना काळात सेवा देणाऱ्या खाजगी डॉक्टरांना देखील ५० लाखांचे विमा कवच.
* राज्यातील मृत्यू दर १ % खाली आणण्यासाठी प्रयत्न.
* सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा दर १७% आहे. तो कमी करायचा आहे.
* इस्लामपूरच्या रुग्णालयात बेस्ट डॉक्टर्स दिले जातील. सरकार पाहिजे ती मदत करेल. खासगी डॉक्टर्सनीही योगदान द्यावे.”
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, “मार्चमध्ये कोव्हिडने धडकी भरवली होती. त्यावर इस्लामपूरकरांनी मात केली. सध्याच्या वाढत्या संख्येच्या धोक्यात सांगली जिल्हा प्रशासन जबाबदारीने काम करत आहे. आरोग्य विभागाने त्यावेळेस इस्लामपूरची जी परिस्थिती होती, ती विचारात घेऊन पुढाकार घेतला आणि टाटा ट्रस्टच्या मदतीने आठ कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे टाटा कुटुंबियांचे ऋणी आहोत. “राजेश टोपे हे आमच्या सरकारचा चेहरा आहेत, ते प्रत्येक ठिकाणी पोहचत आहेत आणि घरात दुःखद घटना घडूनही ते राज्याच्या सेवेत सक्रिय आहेत, अशा भावना मंत्री टोपे यांच्याविषयी व्यक्त केल्या.
जिल्हाधिकारी म्हणाले, “मार्चमध्ये इस्लामपुरात रुग्ण सापडले, त्यावर पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण मिळवता आले. गंभीर रुग्णांसाठी व्यवस्था नसल्यामुळे टाटा ट्रस्टच्या सहकार्याने हे अद्यावत सेंटर उभारले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर जलद कालावधीत उभारणी केली आहे. आता डेडिकेटेड सुविधांचा लाभ होईल. उद्यापासून चांगल्या दर्जाची सेवा त्याठिकाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे.”
टाटा ट्रस्टचे एन. श्रीनाथ म्हणाले, “टाटा समूह मदत नव्हे तर आपले कर्तव्य करत आहे. राज्याच्या लोकांसाठी काहीतरी करतोय याचे समाधान आहे. आम्ही सरकारसोबत विविध कार्यात नेहमी सोबत राहू. प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी स्वागत केले. जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे यांनी आभार मानले. तहसीलदार रविंद्र सबनीस, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, डॉ. राणोजी देशमुख, डॉ. साकेत पाटील, सभापती शुभांगी पाटील, देवराज पाटील, अरुण लाड, विजय पाटील, संग्रामसिंह पाटील, शहाजी पाटील, विश्वनाथ डांगे, नेताजी पाटील आदी उपस्थित होते.