पिंपरी (प्रतिनिधी) – करोनाच्या महामारीत महाराष्ट्र परिवहन महामंडळाला ( एसटी) मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. एसटीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढविणे, उत्पन्नाचे स्रोत वाढविणे, मार्गांचे सुसूत्रीकरण करणे, काही गाड्यांच्या फेऱ्यांचे एकत्रीकरण करणे, अशा काही उपाययोजना करून एसटीच्या उत्पन्न वाढीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी डिजिटल प्रभाताला दिली.
ते वाकडेवाडी येथील एसटी स्थानक आणि दापोडी येथील एसटीच्या कार्यशाळेला भेट दिल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी भोसरी येथील सेन्ट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी ) येथे भेट दिली. या ठिकाणी परब यांनी एसटीच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेत एसटीच्या उत्पन्न वाढीसंदर्भातील विविध पर्यायावर चर्चा केली.
एसटीच्या @msrtcofficial वाढीसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. एसटीचे खासगीकरण नाहीच… : अनिल परब @advanilparab (परिवहन मंत्री) pic.twitter.com/Sb6QHD2al4
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) June 18, 2021
परब म्हणाले, करोनामुळे गेल्या दीड वर्षांत एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही काळ तर, एसटीचे उत्पन्न शून्यावर आले होते. अजूनही एसटीची सेवा पूर्णपणे चालू होण्यासाठी दोन ते तीन महिने लागू शकतात. या काळात एसटीचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहे. एसटीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढ कशी करता येईल, याकडे लक्ष दिले जात आहे.
एसटीचा खर्च कमी करण्यासाठी एसटीच्या मार्गांचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. तसेच काही फेऱ्यांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. तर, ज्या त्या जिल्ह्यात करोनाची परिस्थिती बघून प्रवासी क्षमता वाढवण्याचा निर्णय संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी घेऊ शकतात असे परब यांनी सांगितले.
एसटीचे खासगीकरण नाहीच…
एसटी ही महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी एसटीचे खासगीकरण होणार नाही, असे सांगत परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीच्या खासगीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला. दरम्यान, एसटीच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा पगार थकणार नाही. या अडचणीतून बाबर येण्यासाठी शासनाने एसटीला ६०० कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे वेतानासारख्या अत्यावश्यक गोष्टीना आता अडचण येणार नाही, असेही परब यांनी स्पष्ट केले.
राजकीय प्रश्न टाळले
परिवहन मंत्री अनिल परब यांना राजकीय प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता परब यांनी फक्त एसटीच्या प्रश्नावर बोलणार असून राजकीय प्रश्नावर बोलणे टाळले.