मॅंगोनेटअंतर्गत राज्यातील 3 हजार 1 शेतकऱ्यांकडून नोंदणी
पुणे – दिवसेंदिवस हापूस आंबा निर्यातीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. आंबा परदेशात निर्यात करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या मॅंगोनेटअंतर्गत राज्यातील 3 हजार 1 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. निर्यातक्षम मालाला मिळणारा भाव लक्षात घेत, या नोंदणीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
फळे-भाज्या निर्यातीकरिता आंतरराष्ट्रीय पातळीवर काटेकोटर नियम आहेत. या खाद्य जिन्नसांबरोबर कोणत्याही रोगांचा प्रादूर्भाव होऊ नये, याकरिता दिवसेंदिवस हे नियम आणखी कठोर केले जात आहेत. राज्यात सध्या नाशिकमधील निर्यातक्षम द्राक्षांपासून परकीय गंगाजळी उपलब्ध होत आहे. त्याकरिता राज्य सरकारने नेटग्रप्ससारखा उपक्रम हाती घेतला आहे. या धर्तीवर फळांचा राजा असलेला कोणातील हापूस आंबा सातासमुद्रापार पोहोचावा, याकरिता राज्य सरकारने मॅंगोनेट योजना राबवायला सुरुवात केली आहे.
2014-15 पासून ही योजना राबविली जात आहे. या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, याकरिता निर्यातक्षम आंबा उत्पादनासाठ मार्गदर्शनाबरोबरच वर्षभर मॅंगोनेटकरिता नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, मागील तीन वर्षांची संख्या पाहता नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटली होती. मात्र, गेली वर्षभरता 835 शेतकऱ्यांनी मॅंगोनेटवर नोंदणी केली आहे.
चांगला दर मिळत असल्याने निर्यातीकडे ओढा
कोकणातील हापूस आंब्याला सौदी अरेबिया व युरोप, अमेरिकेतून मोठी मागणी आहे. त्याकरिता या देशांमधील व्यापारी आंबा बागांची पाहणी करून गेल्यानंतर मागणी नोंदविली जाते. शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्याने, शेतकऱ्यांचा ओढा पुन्हा आंबा निर्यातीकडे वाढला आहे.