पुणे- यंदा ऊसाचे उत्पादन चांगल्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे गाळप कसं करायचं हा मोठा प्रश्न समोर आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला उठाव नाही. त्यामुळे यंदा 25 ते 30 टक्के साखर उत्पादन कमी करून इथेनॉल निर्मिती होऊ शकते, याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे माजी केंद्रीय कृषिमंत्री, खासदार शरद पवार यांनी सांगितले.
मांजरी येथील वसंतदादा शुगर इंस्टीट्युट येथे राज्यातील साखर उद्योगाच्या प्रश्नावर आज बैठक पार झाली. त्यानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. साखर तयार करताना आणखी काय पर्याय असू शकतो याबाबत बैठकीत विचार झाला, साखरेपासून इथेनॉल निर्मिती होऊ शकते हाच निष्कर्ष या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी येणारा खर्च, केंद्राचे धोरण, देशाची आणि राज्याची गरज लक्षात घेता इथेनॉल निर्मितीचा निर्णय घेतला असून, त्याबाबत सरकारला कळवू. साखरेला जी किंमत मिळेल तीच इथेनॉला मिळेल, याशिवाय वेळही कमी लागतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथेनॉल बाबतचे जे धोरण जाहीर केलं ते परवडणारे व साखर उद्योगाला अनुकूल आहे, असेही पवार यांनी सांगितले.
सरकारच्या निर्णयात विसंगती…
केंद्र सरकारने जी कृषी विधेयक मंजूर केले त्याबाबत आमची नाराजी आहे. विशेषतः पंजाब, हरियाणा राज्यात ही नाराजी अधिक आहे. याठिकाणी गहू, तांदूळ खरेदी करण्याची जबाबदारी सरकारची होती. आता, धोरणात्मक गोष्टी बदलल्या आहेत. आता, ती खरेदी होईल की नाही याबाबत शेतकऱ्यांत अस्वस्थता आहे. त्यामुळे त्या राज्यातील शेतकऱ्यांत या निर्णया विरोधात अधिक नाराजी आहे. शेतकऱ्याला यापूर्वीही सर्व मार्केट खुले होतेच, यात नवीन काही नाही. शेतकऱ्यांच्या मालाला निर्बंध घालतात हीच सरकारची विसंगती आहे.