मिरवणुकांत वादन करणाऱ्यांच्या भावना
पुणे – पुण्यातील मिरवणुका म्हणजे आसमंतात घुमणारा ढोल-ताशांचा गजर, सनई-चौघड्यांचे सूर आणि नगाराचा निनाद असे सुरेल समीकरण असते. हे मंत्रमुग्ध करणारे वादन अनुभवण्यासाठी देश-विदेशांतून गणेशभक्त आवर्जून येतात. मात्र, यंदा हे वादन अनुभवता येणार नसल्याची हुरहुर अनेक वादकांच्या मनात आहे.
मानाच्या आणि प्रमुख गणपतींच्या मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्यांचे वादन आणि ढोल-ताशा पथकेदेखील ठरलेली असतात. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुका नसल्याने, यावर्षी गणरायाच्या चरणी वादनसेवा समर्पित करण्याची संधी मिळाली नसल्याने हूरहूर वाटत असल्याचे वादक सांगतात. करोनाचे संकट लवकरात लवकर दूर होईल आणि पुढील वर्षीच्या गणेशोत्सवात आणखी जल्लोषात वादन करता येईल, असा विश्वास वादकांनी व्यक्त केला.
यंदा मिरवणुका नाहीत. मंदिरांमध्येच केवळ आरतीपुरते वादन सुरू आहे. काही सोसायट्यांमध्ये दरवर्षी वादन असते, मात्र यंदा बंदी असल्याने वादन नाही. मी मागील 60-65 वर्षे वाजवतो आहे. मात्र वादन आणि मिरवणुका नाहीत, असे पहिल्यांदाच घडत आहे.
– भरतकुमार खळदकर, ज्येष्ठ वादक
यंदा मिरवणुका नसल्याने शांतता वाटत आहे. वादन नसल्याने मनात हुरहुर आहेच. अजूनही एकदा वादनाची संधी मिळावी, असे सारखे वाटते.
– ज्योती खरे, ढोल वादक
यंदा मंडप नाहीत, भाविकांची गर्दी नसल्याने शांतता आहे. मिरवणुका नसल्याने यंदा यावर्षी ध्वनी प्रदूषण नाही, असे अनेक जण म्हणातात. पण आम्ही वादक मंडळी मात्र मिरवणुकीची तयारी, गणपती विसर्जन नसल्याने रुखरुख वाटत आहे. यावर्षी ढोलाचा ठोका, ताशाची तर्री, ध्वजाचा रुबाब असे काहीच नसल्याने नक्कीच वाईट वाटत आहे.
– ऋचा चिपळूणकर, ढोल वादक
यंदा सनई, चौघडा आणि नगारा वादकांना लग्नकार्ये, सांस्कृतिक कार्यक्रम आणि गणेशोत्सव देखील नसल्याने आर्थिकदृष्ट्या देखील मोठा फटका बसला आहे. आम्ही मानाच्या गणपतींना अनेक पिढ्यांपासून वादन करत आहोत. यंदा गणेशोत्सवात वादन करता येत नसल्याची रुखरुख वाटते.
– सुरेश लोणकर, ज्येष्ठ वादक
मागील अनेक ढोल आणि बर्ची वादन करते. मिरवणुकीतील वादनामुळे प्रचंड ऊर्जा मिळत असते. मात्र यंदा मिरवणुका होणार नाहीत. एकंदरीत सुमारे दोन महिने सराव सुरू असतो. या कालावधीत वेगळाच उत्साह अनुभवायला मिळतो. यावर्षी हा उत्साह नाही.
– गार्गी देवचके, ढोल वादक