कोल्हापूर : खासगी वैद्यकीय रूग्णालयांनी अत्यवस्थ रूग्णांना सर्वप्रथम दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करावेत, असे आवाहन करतानाच प्रशासनाने त्यांना त्याबाबत सूचना द्यावी, असे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. मुश्रीफ यांनी कोव्हिड-19 बाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने आदी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यावेळी म्हणाले, खासगी रूग्णालयामध्ये रूग्णांना बेड उपलब्ध करून देण्याबाबत अधिकारी नेमावेत. नागरिकांनी विशेषत: ग्रामीण भागात मास्क न वापरणाऱ्यांवर पोलीसांनी सतर्क राहून कारवाई करावी. अत्यवस्थ रूग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यातील काही रूग्णालये अधिग्रहित करता येतील का याबाबत नियोजन करा. त्याचबरोबर अत्यवस्थ रूग्णांसाठी नवीन यंत्राची माहिती घेवून त्याच्या उपयुक्ततेबाबतही माहिती घ्यावी आणि ते मागविण्याबाबत नियोजन करावे. रूग्णांना वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करू. सीपीआरमध्ये क्षमता वाढवण्यासाठी तयारी करा. ग्रामीण भागातील कोव्हिड केंद्रांवर मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास सीपीआरवर वाढणारा ताण कमी होईल, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी माहिती दिली. प्रत्येक सीसीसीमध्ये एक्सरे काढून त्याबाबतचा अहवाल देण्यासाठी बाह्य यंत्रणा नेमण्यात येत आहे. नॉन ऑक्सिजन बेडसाठी जम्बो ऑक्सिजन सिलेंडरची सुविधा करण्यात येत आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन टँक बसवण्याबाबतची सूचनाही अधिष्ठाता यांना दिली.
लक्षणं दिसताच स्वॅब तपासून उपचार घ्यावेत
अद्यापही रूग्ण अंगावर काढत आहेत आणि अत्यवस्थ झाल्यानंतर उपचारासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे मृत्यू होत आहेत. रूग्णांनी लक्षणं दिसताच स्वॅब तपासणी करण्यासाठी पुढे यावे. तात्काळ उपचार घ्यावेत, असे आवाहन ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी केले.