पुणे – पूरामुळे बाधीत कुटुंबांना राज्य शासनाच्या निकषानुसार तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 15 हजार रुपये दिले जाणार आहेत. सोमवारपासून पहिल्या टप्प्यात 5 हजार रुपये तर, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. मदत वाटपाचे नियोजन तसेच पंचनामे तातडीने पूर्ण करण्यासाठी रविवारी सकाळी महापालिकेत बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. आयुक्तांसह जिल्हाधिकारी सौरभ राव तसेच महापालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते
तसेच, ही मदत वाटप करण्याची जबाबदारी ज्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने पंचनामा केला आहे. त्यांच्यावरच असणार आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेकांच्या घरामधील महत्त्वाच्या कागदपांसह बॅंकांची कागदपत्रे वाहून गेली आहेत. त्यामुळे पंचनामा करतानाच, ज्या नागरिकांकडे बॅंकेची कागदपत्रे नाहीत त्यांच्याकडून बॅंकेचे नाव व शाखेची माहिती घेऊन त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. तर ज्यांच्याकडे बॅंकेची खाती नाहीत, अशा नागरिकासाठी दुर्घटनेच्या ठिकाणी सोमवारपासून बॅंकेचे विशेष कॅम्प घेऊन त्यांची नवीन खाती उघडण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
पुरामुळे ज्यांची घरे पूर्णपणे वाहून गेली आहेत. तसेच ते झोपडपट्टी पुनर्वसनास पात्र असल्यास त्यांना महापालिकेकडे बांधून तयार असलेल्या इनसिटू तसेच इतर योजनांतर्गत बांधण्यात आलेली घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करणार
पुरामुळे सुमारे साडेतीन हजार घरे बाधित असण्याची शक्यता आहे. तर आतापर्यंत अडीच हजार घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र, त्याचवेळी महापालिकेच्या मते जिल्हा प्रशासनाने केवळ वस्ती आणि झोपडपट्ट्यांचे पंचनामे केले असून सोसायट्यांमधील नागरिकही बाधित आहेत. त्यामुळे त्यांचाही पंचनामा करावा, अशी चर्चा झाली.