ओतूर -खामुंडी (ता. जुन्नर) येथे ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमताने शासकीय निधीमध्ये अफरातफर करून पैशांचा अपहार केला. अशी फिर्याद जुन्नर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अंकुश किसन खांडेकर यांनी ओतूर पोलीस ठाण्यात दिली.
या तक्रारीत म्हटले आहे की, अपहार झालेले कालावधीतील तत्कालीन ग्रामसेवक अनिकेत तानाजी राजगुरू (रा. गणेश नगर, येडगाव, ता. जुन्नर) व तत्कालीन सरपंच माया महेश गंभीर (रा. खामुंडी, ता.जुन्नर) यांनी दि. 27 ऑक्टोबर 2016 ते दि. 2 जुलै 2018 या कालावधीमध्ये संगनमताने प्रमाणकाशिवाय खर्च केला.
यामध्ये 14वा वित्त आयोग निधी खर्च 6 लाख 25 हजार 550, पाणीपुरवठा निधी खर्च 21 हजार 200, ग्रामनिधी खर्च 69 हजार 82, दरपत्रकाशिवाय व निविदेशिवाय केलेली खरेदी 14वा वित्त आयोग निधी खर्च 3 लाख 88 हजार 500, पाणीपुरवठा निधी खर्च 82 हजार 11 व ग्रामनिधी खर्च 2 लाख 18 हजार 458, ग्रामपंचायत सदस्य बैठक भत्ता 60 हजार, ग्रामनिधी कर वसुली भरणा नसलेबाबत 75 हजार 506 , पाणीपुरवठा निधी भरणा न केलेबाबत 41 हजार 290 असा एकूण 15 लाख 81 हजार 597 रुपयांचा अपहार केला आहे.असे या तक्रारीत म्हटले आहे.
यावरून ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे करीत आहेत.