राजगुरुनगर -राजगुरूनगर नगरपरिषदेत सन 2018-2019 या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांनी 71 लाख 69 हजार रुपयांचा अपहार केला आहे. याबाबत नगरसेवक संपदा सांडभोर, शंकर राक्षे, राहुल आढारी, सचिन मधवे यांनी नगरपालिका संचानालय मुंबई, पुण्याचे विभागीय आयुक्त, नगर परिषदेचे मुख्याधिकरी यांच्याकडे तक्रार करूनही दोषींवर गुन्हा दाखल केला जात नाही. दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी चार नगरसेवकांसह शहरातील 234 नागरिकांनी सह्या केलेले निवेदन राजगुरूनगर नगर परिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी संजय तेली यांना दिले आहे.
नगर परिषदेत सन 2018-2019 या कालावधीत काही कर्मचाऱ्यांनी 71 लाख 69 हजार रुपयांचा आर्थिक अपहार केला आहे. ही बाब विशेष लेखा परीक्षणात उघड झाली आहे. यात काही दोषी कार्मचाऱ्यांनी अपहरणाची काही रक्कम भरली आहे. तथापि या अपहार करणाऱ्या दोषी व्यक्तींवर अजूनही कारवाई झाली नाही. नगरपरिषदेच्या संपदा सांडभोर, शंकर राक्षे, राहुल आढारी, सचिन मधवे या नगरसेवकांनी जिल्ह्याचे आयुक्त, नगरपालिका संचालनालय मुंबई यांच्याकडे दाद मागितली होती; मात्र त्यावर अद्याप निर्णय झाला नाही.
महाराष्ट्र नगरपालिका नगर पंचायत औद्योगिक अधिनियम 1965 नुसार नुसार संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे व फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना आहेत. मात्र त्यांनी अद्यापपर्यंत कारवाई केली नाही. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून आता प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी संजय तेली यांनी लक्ष घालावे, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन प्रशासक तथा प्रांताधिकारी संजय तेली यांना देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, उपनगराध्यक्षा वैशाली बारणे, नगरसेवक नगरसेवक संपदा सांडभोर, शंकर राक्षे, राहुल आढारी, रेखा क्षोत्रीय, सारिका घुमटकर, रफिक मोमीन, अमोल सांडभोर, निलेश घुमटकर हे उपस्थित होते.