पुणे -शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)मध्ये 16 हजार 705 पात्र परीक्षार्थींमध्ये 7 हजार 880 अपात्र परीक्षार्थींचे गुण वाढवून त्यांना पात्र करण्यात आले आहे. त्यापैकी नाशिक विभागात सर्वाधिक 2 हजार 770 अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यात आले असल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यांत मालेगाव येथून आणखी एका आरोपीस अटक केली आहे. प्रथम न्यायदंडाधिकारी एस.जी. डोलारे यांनी त्याला 14 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.
मुकुंदा जगन्नाथ सुर्यवंशी (वय 33, रा. मालेगाव, जि. नाशिक) अशी कोठडी सुनावलेल्याचे नाव आहे. याप्रकरणात आतापर्यंत एकूण 15 आरोपींना अटक केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात आरोपी संतोष हरकळ याच्याकडून जप्त केलेल्या लॅपटॉपमधून 1,270 परीक्षार्थींच्या यादीतील 1,126 परीक्षार्थी व त्यांचे गुण वाढविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
यातील अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी गुण वाढविण्यात आलेल्या यादीतील कोणकोणत्या परीक्षार्थींना आरोपी मुकुंद सुर्यवंशी याने संपर्क केला आहे याचा तपास करणे, आरोपीने शिक्षक पात्रता परीक्षा 2019-20 च्या परीक्षेत त्याने अशाप्रकारे किती अपात्र परीक्षार्थींना गैरमार्गाने पात्र केले आहे का? तसेच त्याच्या संपर्कात असलेल्या इतर दलालांचा शोध घेणे यासाठी आरोपी सुर्यवंशी यास सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.