देवेंद्र फडणवीस : “एल्गार’प्रकरणी “एसआयटी’ची मागणी आश्चर्यकारक
शरद पवार यांचे वक्तव्य सोयीचे
पुणे – “एल्गार परिषद कार्यकर्त्यांवरील खटल्याबाबत शरद पवारांनी “एसआयटी’ची मागणी करणे आश्चर्यकारक आहे. शहरी माओवाद ही संकल्पना भाजपची नसून, शरद पवार हे ज्या मंत्रिमंडळात होते, त्याच मंत्रिमंडळाने 2014 मध्ये सादर केलेल्या “प्रतिबंधित संस्था’च्या यादीतच ही संकल्पना आहे. त्याच यादीतील लोकांना आम्ही अटक केली, तर ते चुकीचे कसे? या प्रकरणासंदर्भात पवारांचे हे सोयीचे वक्तव्य आहे,’ अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे सोमवारी आयोजित “वार्तालाप’ कार्यक्रमात फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हिवाळी अधिवेशन, कर्जमाफी, नागरिकत्व कायदा-आंदोलने, घोटाळ्यांचे आरोप यावरील प्रश्नाची मुद्देसूद उत्तरे त्यांनी यावेळी दिली.
फडणवीस म्हणाले, “भीमा-कोरेगावप्रकरणात अटक झालेल्या सुधीर ढवळे, सुधा भारद्वाज, वरवरा राव यांना यापूर्वीदेखील विविध प्रकरणांसाठी अटक झाली होती. विशेष म्हणजे, ज्यावेळी शरद पवार हे स्वत: मंत्रिमंडळात होते, त्यावेळी ही कारवाई झाली होती. या प्रकरणात त्यांनी जे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे मांडले आहे, ते तीनपैकी एका न्यायाधीशाने दिलेली नोंद होती. त्याचा सोयीस्कर वापर पवारांनी करून घेतला आहे. मात्र, त्यांचे हे वक्तव्य पोलिसांचे मनोबल खच्ची करणारे आहे.’
कर्जमाफीबाबत फडणवीस म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारची शेतकरी कर्जमाफी योजना फसवी आहे. आमच्या सरकारने केलेल्या कर्जमाफीचीच अंमलबजावणी असून, नवीन एकही मदत या कर्जमाफीत नाही. इतकेच नव्हे, तर मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्जाअंतर्गत असलेल्या मोठा वर्ग या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे.’
एखाद्याची जात ही लोकांच्या मनात नसते, ती राजकीय नेत्यांच्या डोक्यात असते. याची प्रचिती मी स्वत: अनेकवेळा घेतली आहे. निवडणुका जवळ आल्या, की नामवंत असे पुरोगामी नेते, कार्यकर्तेदेखील जातीचा उल्लेख करत त्यानुसार कार्य करतात. सर्वसामान्य नागरिक याबाबत फारसा विचार करत नाही. मात्र, राजकीय नेते त्यांना तो विचार करायला भाग पाडतात.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते