मुंबई : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर आज खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब होणार आहे. राज्याच्या राजकारणातील नव्या पर्वाविषयी बोलताना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी “महाराष्ट्रात आज क्रांतिकारक घटना घडणार आहे, असे म्हटले आहे.
याविषयो बोलताना संजय राऊत यांनी,”प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. त्यात युतीची घोषणा होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हे क्रांतीकारक पाऊल आहे. बाबासाहेबांचे नातू आणि प्रबोधनकार ठाकरेंचे नातू एकत्र येणार आहेत. ही तर सुरुवात आहे. आता महाराष्ट्रात अजून बरंच काही घडणार आहे, असे सूचक वक्तव्य केले आहे.
शिवशक्ती आणि भीमशक्तीचा
एल्गार!!
संयुक्त पत्रकार परिषद
23 जानेवारी
12.30
आंबेडकर भवन
नायगाव..
महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व.. pic.twitter.com/PYkNeNAO0Y— Sanjay Raut (@rautsanjay61) January 22, 2023
तसेच पुढे बोलताना. ‘ही दोन पक्षाची युती नाही. तर शिवशक्ती-भीमशक्तीची युती आहे. ही विचारांची युती आहे. दोघांची ताकद महाराष्ट्राबाहेरही आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्वप्न होतं. दोन्ही विचारधारा एकत्र याव्यात. दोन शक्ती एकत्र याव्यात. कुणाला वाटत असेल आमच्यामागे महाशक्ती आहे, आम्हाला महाशक्तीचा पाठिंबा आहे. पण त्यात तथ्य नाही. ठाकरे-आंबेडकर एकत्र येईल ती खरी महाशक्ती असेल. त्या महाशक्तीसमोर कुणाचा टिकाव लागणार नाही. या महाशक्तीमुळे आघाडी अधिकच मजबूत होईल, असेदेखील संजय राऊत म्हणले.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाबद्दलही भाष्य केलं. उद्धव ठाकरे हेच पक्षाचे प्रमुख राहतील. ते आजही आहेत. उद्याही राहतील. हा तांत्रिक मुद्दा आहे. त्यांची निवड पक्षाच्या प्रमुख प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना स्वीकारलं आहे. त्यामुळेच तेच पक्षप्रमुख राहतील, असे राऊत म्हणाले.