शिक्षण मंत्री विनोद तावडे: विद्यार्थ्यांचे समान पातळीवर मूल्यमापन होणे आवश्यक
मुंबई – अकरावी प्रवेश प्रक्रिया नियमित वेळापत्रकानुसारच सुरु करण्यात येत असून या प्रक्रियेला कोणताही विलंब झालेला नाही. अकरावी प्रवेशासंदर्भात काही दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात साशंकता असली तरी विद्यार्थ्यांचे नुकसान राज्य शासन होऊ देणार नाही, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या मुलांना प्रवेशात प्राधान्य मिळेल. मात्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशात प्राधान्य मिळाणार नाही, अशी अनाठायी भीती व्यक्त करण्यात येत असून अनेक पालक अकरावी प्रवेशासाठी आपल्याला भेटत असल्याचे तावडे यांनी सांगितले.
राज्य मंडळ, सीबीएसई आणि आयसीएसई विद्यार्थ्यांचे समान पातळीवर मूल्यमापन होणे आवश्यक आहे. अकरावी प्रवेशासाठी काही नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चढाओढ असते. हे लक्षात घेता या महाविद्यालयांमधील जागा वाढविता येऊ शकतील का याबाबत बैठक घेण्यात येणार आहे.
राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना यंदा अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने त्यांना मिळालेल्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. याच पद्धतीने सीबीएसई, आयसीएसई या विद्यार्थ्यांना त्यांच्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीत प्रवेश देण्यात यावा. मात्र त्यांचे तोंडी परीक्षेचे अंतर्गत गुण प्रवेशावेळी ग्राह्य धरण्यात येऊ नये,अशी मागणी होत आहे. याबाबत राज्य सरकारच्यावतीने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री, त्याचप्रमाणे सीबीएसई, आयसीएसई बोर्ड यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांची अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेची आकडेवारी पाहता आयबी, आयसीएसई आदी बोर्डाच्या केवळ 7 ते 9 इतक्या कमी संख्येने विद्यार्थी प्रवेश घेतात. याहून विद्यार्थ्यांची संख्या जास्त नाही. सीबीएसई व आयसीएसई बोर्डाचे सुमारे साडेचार टक्के विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतात, ही वस्तुस्थिती असल्याची बाब तावडे यांनी यावेळी निदर्शनास आणली.