मुंबई – इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी उच्च न्ययालयाने रद्द केली असून इयत्ता दहावीच्या गुणांच्या आधारावरच मुलांना अकरावीत प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सीबीएसीसह अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 2 ऑगस्टपर्यंत होती. त्यामुळे 11 वी प्रवेशप्रक्रिया कधी सुरु होणार? याकडे आता विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. उच्च न्यायालयाने सीईटी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासही नकार दिला. त्यामुळे हा निर्णय म्हणजे राज्य सरकारला मोठा धक्का असल्याचे मानले जाते.
प्रवेश प्रक्रियेशी खेळ करता येणार नाही, ती बदलता येणार नाही.तसेच, त्यांच्या अंतर्गत मुल्यमापनानुसार इयत्ता दहावीत जे गुण मिळाले असतील त्या आधारावरच इयत्ता अकरावीत प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही देऊन करोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळेच न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप केला असल्याचे स्पष्ट केले.
या निर्णयामुळे सीईटी संदर्भात 25 मे रोजी राज्य सरकारने काढलेला अध्यादेश रद्द ठरला आहे. आधीच रखडलेल्या अकरावीच्या प्रवेशामुळे या निर्णयाला स्थिगिती देऊन, आम्ही ही प्रक्रिया आणखी लांबवत नाही. मुलांचे शैक्षणिक वर्ष आधीच बऱ्यापैकी वाया गेलेले आहे, असे कारण देत राज्य सरकारची निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी देखील न्यायालयाने फेटाळली.
राज्य मंडळाने दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार होती. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार होती.
दरम्यान, निकालाची प्रत अद्याप मिळाली नाही. उच्च न्यायालयाने कोणत्या मुद्द्यावर निकाल नाकारला हे तपासून आम्ही निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया शिक्षण खात्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
अकरावी सीईटी’साठी 11 लाख अर्ज
राज्य मंडळातर्फे होणाऱ्या अकरावीच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (सीआयएससीई) आदी मंडळांच्या 36 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे, तर एकूण 10 लाख 98 हजार 318 विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरलेले आहेत.