पुणे – इयत्ता अकरावी प्रवेशासाठी “सीईटी’ घेण्यात येणार आहे. या अर्ज नोंदणीसाठी उपलब्ध केलेल्या संकेतस्थळातील तांत्रिक अडचणी अद्याप दूर झालेल्या नाहीत. त्यामुळे तीन दिवसांपासून संकेतस्थळ बंदच आहे. दरम्यान, संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार आहे.
राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर अकरावी प्रवेशासाठी येत्या 21 ऑगस्ट रोजी “सीईटी’ घेण्याबाबत सविस्तर अधिसूचनाही जारी केली आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी हीीं:/ि/लशीं.ाह-ीील.रल.ळप हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले होते. 20 जुलैपासून या संकेतस्थळावर अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या संकेतस्थळ कोलमडले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडथळा निर्माण झाला. विद्यार्थी, पालकांनी आराडाओरड केली.
राज्यात अकरावीसाठी सुमारे 16 लाख विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. तर, “सीईटी’ ऐच्छिक ठेवण्यात आली असून आतापर्यंत “सीईटी’ साठी 1 लाख 46 हजार विद्यार्थ्यांनीच अर्ज नोंदवले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनाही अर्ज नोंदणी करायची असून संकेतस्थळ कधी सुरू होणार याकडे लक्ष लागले आहे. त्यातच अद्यापही सीबीएसई, सीआयसीएसईच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकालही लागलेला नाही. त्यामुळे “सीईटी’चे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ ही द्यावीच लागणार आहे.
अकरावी “सीईटी’च्या संकेतस्थळातील तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर ते पुन्हा बंद पडणार नाही, याची सर्व दक्षता घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत. लवकरच संकेतस्थळ सुरु करण्यात येणार असून त्याबाबतच्या सूचनाही प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना आधी 26 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता विद्यार्थ्यांना निश्चितपणे पुरेशी मुदतवाढ देण्यात येणार आहे. – दिनकर पाटील, अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ