पुणे -अकरावी प्रवेशासाठी “कट ऑफ’ची पहिली यादी 27 ऑगस्ट रोजी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करीत बुधवारी दिली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे पहिल्या गुणवत्ता यादीकडे लक्ष लागले आहे.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक या शहरांत केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. या पाच शहरांतील अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी 3 लाख
75 हजार 351 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते.
त्यापैकी सुमारे 3 लाख 6 हजार अर्ज स्वीकारले गेले आहेत. पहिल्या प्रवेश फेरीनंतर आणखी तीन फेऱ्या होणार आहेत, असेही प्रा. गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. पुण्यात एकूण 77 हजार 276 अर्ज दाखल झाले, त्यापैकी 59 हजार 886 अर्ज स्वीकारले गेले. अमरावतीमध्ये नोंदणीची एकूण संख्या 10 हजार 673 होती. त्यापैकी 8 हजार 158 अर्ज स्वीकारले गेले. मुंबईत नोंदणीची एकूण संख्या 2 लाख 37 हजार 952 असून यामधील 2 लाख 2 हजार 58 अर्ज स्वीकारले गेले. नागपूर विभागात एकूण 27 हजार 239 नोंदणी झाल्या. त्यापैकी 19 हजार 256 अर्ज स्वीकारले गेले. नाशिक विभागात नोंदणीची एकूण संख्या 22 हजार 211 होती त्यापैकी 16 हजार 753 अर्ज स्वीकारले गेले, असेही प्रा. गायकवाड यांनी सांगितले.