पुणे – इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया तब्बल अडीच महिन्यांनंतर पुन्हा गुरुवारपासून सुरू होणार आहे. दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. एसईबीसी प्रवर्गाकरीता आरक्षण न ठेवता ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली. यामुळे अकरावीसह आयटीआय, डी.एल.एड., पॉलिटेक्निकसह आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेलाही स्थगिती दिली. प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला होता. विद्यार्थी, पालक, संघटनांकडून प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची शासनाकडे मागणी करण्यात आली होती.
याची दखल घेत महाधिवक्तांकडून कायदेशीर अभिप्राय मागविले होते. ते विचारात घेऊन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्याबाबतचे आदेशही सामान्य प्रशासन विभागाचे अव्वर सचिव र. अं. खडसे यांनी दिले. हा शासन निर्णय अंतरिम स्थगिती उठविण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत लागू राहणार आहे.
पुढील प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रकही लवकरच जाहीर होणार आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी स्पष्ट केले. ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी एसईबीसीच्या प्रवर्गातून प्रवेशासाठी अर्ज केले असतील परंतु त्यांना प्रवेश देण्यात आले नसतील अशा एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातूनच प्रवेश देण्यात यावे, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.