सातारा -सातारा जिल्ह्यातील इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेस दि. 14 ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने असेल. जेथे ऑनलाईन पद्धतीने करणे शक्य नाही तेथेच ऑफलाईन पद्धतीने प्रक्रिया होणार आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
दहावी परीक्षेत जिल्ह्यातील 41 हजार 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यात 51 हजार 60 जागा आहेत. या प्रवेशासाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी संकेतस्थळ, लिंक याची व्यवस्था करावी. जेथे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविणे शक्य होणार नाही तेथे सोशल डिस्टन्सिंग सांभाळून विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी 14 ते 19 ऑगस्ट या कालावधीत अर्ज घेणे व देणे ही प्रक्रिया करावी.
त्यानंतर 20 ते 24 ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयांनी प्रवेश अर्जाची छाननी, तपासणी व गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करावी. प्रवेशासाठीची गुणवत्ता यादी 25 ऑगस्टला दुपारी तीन वाजता जाहीर करावी. प्रवेशाची निवड यादी व प्रतीक्षा यादी कनिष्ठ महाविद्यालयांनी सूचना फलकांवर लावावी, अशी सूचना क्षीरसागर यांनी केली. दि. 26, 28, 29 आणि 31 ऑगस्ट या कालावधीत गुणवत्तेनुसार निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश दिला जाईल.
प्रवेश शिल्लक असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्राच्या आधारे दोन व तीन सप्टेंबर रोजी प्रवेश देण्यात येणार आहे. दि.4 आणि 5 सप्टेंबर रोजी दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाईल. रिक्त जागांवर एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना दि. 7 व 8 सप्टेंबरला प्रवेश द्यावा, असे त्यांनी सांगितले. अकरावी प्रवेशापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयांनी सूचनांचे पालन करून प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात अनुदानित प्रकारात कला शाखेसाठी 15460, वाणिज्य 7080, विज्ञान 11200, संयुक्त 3000 तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) 800 जागा आहेत. विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित प्रकारात कला शाखेसाठी 3360, वाणिज्य 1120, विज्ञान 3840, संयुक्त 240 तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) 400 जागा आहेत. याबरोबरच स्वयंअर्थसहायता प्रकारात कला शाखेसाठी 240, वाणिज्य 880, विज्ञान 3040, संयुक्त 400 जागा आहेत.
– राजेश क्षीरसागर (माद्यमिक शिक्षणाधिकारी)