पुणे – मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, अमरावती या महापालिका क्षेत्रांत अकरावीचे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीनेच करण्यात येणार आहेत. हे क्षेत्र वगळता उर्वरित राज्यातील भागातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जाणार आहेत. वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियेची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत.
करोनाच्या नियमांचे पालन करूनच प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यातही 31 ऑगस्ट रोजी दुसरी नियमित प्रवेश फेरी, 5 सप्टेंबर रोजी तिसरी प्रवेश फेरी, 12 सप्टेंबर रोजी विशेष प्रवेश फेरीबाबत सविस्तर सूचना जारी करण्यात येणार आहेत.
असे आहे वेळापत्रक
दि.14 ते 22 ऑगस्ट
विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणीसाठी लॉग-इन आयडी व पासवर्ड उघडणे, अर्जाचा भाग-1 भरणे, मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज पडताळणी करणे, अर्जाच्या माहितीत बदल करून तपासणी करणे, कोटा प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना अर्ज पाठविणे.
दि.17 ते 22 ऑगस्ट
कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशाच्या जागा दर्शविणे, पहिल्या फेरीत अर्जाचा भाग-2 भरणे, कोटा प्रवेश (व्यवस्थापन, इनहाऊस, अल्पसंख्याक), कोटा प्रवेशाच्या जागा प्रत्यार्पित करणे.
दि.23 ते 24 ऑगस्ट
तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे, यादीवर आक्षेप नोंदविणे व त्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सोडविणे
दि.25 ऑगस्ट
पहिल्या प्रवेश फेरीची अंतिम गुणवत्ता यादी निश्चित करणे, डेटा प्रोसेसिंग
दि.27 ऑगस्ट
विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले कनिष्ठ महाविद्यालय समजणार, कट ऑफ जाहीर होणार, विद्यार्थ्यांना प्रवेशाचा एसएमएस पाठविणार.
दि.27 ते 30 ऑगस्ट
विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे, कोटा प्रवेश प्रक्रिया सुरूच, व्यवस्थापन कोटा प्रत्यार्पित करणे, दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी अर्ज नोंदणी व अर्जाचा भाग-1 भरणे
दि.30 ऑगस्ट
कनिष्ठ महाविद्यालयांनी झालेल्या प्रवेशाची माहिती संकेतस्थळावर दर्शविणे, दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी रिक्त जागा दर्शविणे