शासनाकडून आठवडाभरात”ग्रीन सिग्नल’ मिळणार
– डॉ. राजू गुरव
पुणे – करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, याबाबत शिक्षण विभागाकडून आठवडाभरात निर्णय आणि वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. शासनाने “ग्रीन सिग्नल’ दिल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
लॉकडाऊनमुळे मार्चपासून शाळा व महाविद्यालय बंद आहेत. तर पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या महापालिका हद्दीत अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन पद्धत राबवण्यात येते. उर्वरित भागात ऑफलाइन प्रवेश होतात.
मागील तीन वर्षांपासून अकरावी ऑनलाइन प्रवेशाचे कामकाज “नायसा’ या कंपनीमार्फत करण्यात आले. यंदा मात्र तलिष्मा या एजन्सीमार्फत प्रवेशाचे कामकाज सुरू होणार आहे. राज्य मंडळांच्या शाळांच्या दहावीच्या निकालाबरोबरच सीबीएसई, सीआयएसई, आयसीएसई, आयबी, एनआयओएस मंडळांच्या परीक्षांचे निकाल कधी लागतात, यावर अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक अवलंबून असणार आहे.
या प्रक्रियेसाठी राज्यस्तरीय व विभागनिहाय समित्या स्थापन आहेत. अकरावी प्रवेशाबाबत प्रस्ताव तयार करुन मान्यतेसाठी पंधरा दिवसांपूर्वी पाठवण्यात आला आहे. मात्र, शासनाने त्यावर काहीच निर्णय कळवलेला नाही. दरवर्षी बालभारतीकडून प्रवेशाबाबतची मार्गदर्शक पुस्तिकांची छपाई करण्यात येते.
पण, सुरक्षिची बाब विचारात घेऊन यंदा मात्र या पुस्तिका छापण्यात येणार नाहीत, अशी शक्यता आहे. पोर्टलवरच ऑनलाइन पुस्तिका उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. शासनाने प्रवेशाचा निर्णय घेतल्यानंतर तात्काळ विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग-1 भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यानंतर दहावीचा निकाल लागल्यानंतर भाग-2 भरुन प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
दहावीच्या निकाल कधी लागणार, यावर अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक व प्रक्रिया अवलंबून असणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या वेळी कोणत्याही मार्गदर्शन केंद्र, कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी यांची गर्दी होणार नाही याची खबरदारीही बाळगावी लागणार आहे. सर्वांच्या सुरक्षेतचा विचार करुनच प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा आराखडा राबवावा लागणार आहे.
– दिनकर पाटील, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक