दखल : जगदीश देशमुख
26 नोव्हेंबर 2008 चा मुंबईवरील हल्ला म्हणजे 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. या हल्ल्याला आज 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. या 11 वर्षांत भारतीयांची दहशतवादाविरोधात मानसिकता कशी बदलली. भारतीय असे दहशतवादी हल्ले होऊ नयेत म्हणून काय खबरदारी घेऊ लागले आहेत आणि आणखी काय खबरदारी घ्यायला पाहिजे या बाबतीमध्ये विचारमंथन होणे गरजेचे आहे.
दहशतवाद्यांनी मुंबई शहरात एकूण दहा ठिकाणी हल्ले चढविले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगाव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सीमध्ये स्फोट झाला. 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह कमीतकमी 197 जण ठार झाले, 800 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी 9 दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
26 नोव्हेंबर 2008 मुंबईच्या इतिहासातील काळ्या अक्षरात लिहिण्याचा दिवस. या दिवशी मुंबई हादरली ती दहशतवादी हल्ल्याने. तसे अनेक हल्ले मुंबईने आजपर्यंत पचवलेत; पण हा हल्ला इतका भयानक होता की या हल्ल्यानंतर प्रत्येक मुंबईकर दहशतवादाविरोधात जागरूक झाला. या जागरूकतेमध्ये भर घातली ती सिनेमा, सोशल मीडिया आणि विविध स्वयंसेवी संघटनांनी. प्रत्येक मुंबईकर दहशतवादाविरोधात स्वतःच एक पोलीस आहे अशा भावनेतून वागू लागला. सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना एखादी बेवारस वस्तू दिसल्यास त्याबाबत पोलिसांना कल्पना देणे, अनोळखी व्यक्तीबद्दल चौकशी करणे, इथपर्यंत तो जागरूक झाला. त्यामुळेच 2008 नंतर मुंबईवर कुठलाही दहशतवादी हल्ला झाला नाही. मात्र दहशतवादाविरोधात लढा द्यायचा असेल तर इतकी जागरूकता खूप झाली का तर नाही. आपल्यामध्ये अधिक सजक जागरूकता येण्याची गरज आहे.
मॉल्स, मल्टिप्लेक्स, हॉस्टेल आणि शाळा ही दहशतवाद्यांची सॉफ्ट टार्गेट असतात. त्यामुळे इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, येथे जाणाऱ्या नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. येथे सीसीटीव्ही असतात. मोठमोठ्या बिल्डिंग कॉम्प्लेक्स येथे ही सुविधा आहे.
सर्वसामान्य वस्त्यांमध्ये, चाळींमध्ये आणि साध्या इमारतींमध्ये राहणाऱ्यांनी 1) आपल्यापैकी जर कोणी भाड्याने घर दिले असेल तर त्याची नोंदणी जवळच्या पोलिसस्टेशनमध्ये करावी. 2) आपल्या परिसरात अथवा आपल्या बिल्डींगमधे जर कोणी नवीन व्यक्ती राहायला आली तरी तिची नीट चौकशी करावी. त्यातूनही काही संशयास्पद आढळल्यास ताबडतोब पोलिसांना कळवावे.
पोलीस प्रशासन आणि सरकार यांनी 1) आरडिक्स डिटेक्ट करणारे मशीन संवेदनशील ठिकाणी लावावे. 2) दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे असल्यामुळे नागरिकांच्या प्रतिकाराला मर्यादा येतात. 3) “सिव्हिल डिफेन्स’सारख्या योजना सामाजिक संस्थांनी राबवायला हव्या. दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते. तर मग स्थानिक पोलिसांनाही त्यांचा मुकाबला करण्याचे प्रशिक्षण द्यावे. बॉम्बस्फोटानंतर दुसऱ्या दिवशी “जनजीवन सुरळीत’ या कौतुकापेक्षा बॉम्बस्फोट होणार नाहीत यासाठी सुरक्षा सक्षम करायला हवी.
देशातील दहशतवाद संपलेला नाही. अशावेळी “शिवबा’ व त्यांच्या कडक, कठोर चेकनाक्यांची आठवण येते. पुरेशी ओळख न पटल्याने खुद्द शिवबांनाच त्यांच्या दक्ष मावळ्याने हटकले. हा इतिहास आपण विसरलो; असे शिथिल यंत्रणांकडे पाहून वाटते. टॉवर्सवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने त्यांची तपासयंत्रणा कडक केली. इस्रायलकडे वक्र दृष्टीने बघण्याची हिंमत कोणाची होत नाही. त्यामुळे दुबळ्या भारताकडे दहशतवाद्यांनी मोर्चा वळविला. आपली शेकडो माणसे मारूनही एक-दोन दहशतवाद्यांना फाशी देण्यास आपण मागे-पुढे पाहतो. आज प्रत्येक भारतीयानेच “शिवबाच्या’ एकनिष्ठ मावळ्यासारखे सावध व्हावे. आसपासची संशयास्पद घटना ताबडतोब पोलिसांना कळवावी. मग ती व्यक्ती असो, एखादी बेवारस वस्तू किंवा अन्य काही! तरच दहशतवादाला थोडा पायबंद बसेल!
आपल्यात भिनलेले “बेशिस्त गलथानापण, कामचुकार वृत्ती, भ्रष्टाचार व कायदेभंग करण्याची वृत्ती हे दुर्गुण निपटण्यासाठी स्वत:पासून प्रयत्न करावे लागतील. घरात, घराबाहेर, रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी सावधपणे व शिस्तीत वागण्याची सवय अंगी बाणवावी लागेल. अमेरिकेने एकाच दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर दहशतवाद्यांच्या जशा मुसक्या बांधल्या तशी इच्छाशक्ती भारतीय सरकारने बनवावी लागेल. सर्वप्रथम सरकारने तुरुंगातल्या सर्व दहशतवाद्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना ताबडतोब खटले चालवून त्यांचा सोक्षमोक्ष लावावा. वेळकाढू खटल्यांमुळे दहशतवाद्यांना कायद्याचे भय राहत नाही. वैचारिक पातळीवरचा दहशतवाद हा धार्मिक स्वरूपाचा आहे, तसाच नक्षलवादी विचारसरणीतूनदेखील दहशतवाद निर्माण होताना दिसून येतो. जोपर्यंत या लढ्यांचा आपण सद्सद्विवेक बुद्धीने आणि आक्रमकपणे सामना करत नाही, तोपर्यंत या चक्रव्युव्हातून देशाची आणि पर्यायाने आपली सुटका नाही.