पिके धोक्यात; महावितरणचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष
नाणे मावळ – नाणे मावळातील करंजगावच्या शेतकऱ्यांची शेतीची कामे रखडली आहेत. शेतकऱ्यांची पिके विजेच्या अनियमिततेमुळे धोक्यात आली आहे. वडीवळे धरणामुळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या पाण्याच्या जोरावर या भागात ऊसाचे व इतर पिकांचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहे. महावितरणाच्या दुर्लक्षित कारभारामुळे येथील शेतकऱ्यांची “धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याकडे महावितरण दुर्लक्ष करीत आहेत.
पौष महिन्यात शेतकरी बांधव उसाची लागवड करतात. आजच्या स्थितीला करंजगाव या ठिकाणी शेतकरी बांधव ऊस लागवड करीत आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांच्या पाण्याचे विद्युत पंप अनेक दिवसांपासून बंदच राहत आहेत. दिवसभर येथील शेतकऱ्यांचा वेळ वाया जात आहे. शिवाय पाण्याअभावी पिके धोक्यात आली आहेत. ऊस लागवड रखडलेल्या अवस्थेत असून, ऊसाचे बियाणे वाळू लागले आहे.
करंजगावच्या भागातील शेतकऱ्यांना बुधवडी गावातील ट्रान्सफॉर्मरमधून विजेचा पुरवठा करण्यात येत आहे; परंतु शेतकऱ्यांची संख्या पाहता तो उपाय तुटपुंज्या स्वरूपाचा ठरत आहे.
शेती करंजगावात तर ट्रान्सफॉर्मर बुधवडी व सांगिसे गावात असल्यामुळे शेतकरी बांधवाचे पाण्याचे विद्युत पंप सुरू झाल्यास ट्रान्सफॉर्मरवर ताण निर्माण होतो व ट्रान्सफॉर्मरचे फ्यूज “गूल’ होता. त्यामुळे पाण्याचे विद्युत पंप बंद पडतात.
पाण्याचे विद्युत पंप बंद पडल्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे महावितरण लक्ष देण्यास तयार नाही. शेतकरी बांधवांचे होत असलेली नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.
वर्षभरापासून हा प्रश्न प्रलंबित असतानाही देखील महावितरण विभागाने तात्काळ करंजगावच्या भागातील शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राजेश शिवाजी टाकवे, संजय सोनू टाकवे, सुनील टाकवे, अनिल माझिरे, भाऊसाहेब मोरमारे, मंगेश मोरमारे, नानासाहेब साबळे, संजय भुरूक यांनी केली आहे.