पाच लाख रुपये चालू थकबाकी भरल्यावर होणार वीजपुरवठा पूर्ववत
महिलांची पाण्यासाठी होत आहे भटकंती
अकोले (प्रतिनिधी) – महावितरणने वीजबिल थकबाकीमुळे राजूरच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे राजूर गावात निर्जळी सुरू झाली आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी दाही दिशा भटकाव्या लागणार आहेत. माजी मंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे पुन्हा वीजपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती उप सरपंच गोकुळ कानकाटे यांनी दिली.
अकोले तालुक्यातील सर्वांत मोठी पेसा ग्रामपंचायत म्हणून राजूर ग्रामपंचायतची ओळख आहे. चाळीसगाव डांगणाची खऱ्या अर्थाने मुख्य बाजारपेठ असलेल्या राजूरचा पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकीत असल्याने महावितरण कंपनीने ते तोडल्याने या गावात सतत राबता असणाऱ्या इतर सामान्य आदिवासी बांधवांनाही या पाणी टंचाईची झळ बसणार आहेत. राजूर ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना अनेक वर्षांपासून तोट्यात सुरू आहे. ग्रामस्थांकडे पाणी पट्टी व घरपट्टी थकबाकी मोठ्या प्रमाणावर थकीत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडे वीजबिल भरण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. महावितरण कंपनीने पाच लाख रुपये चालू थकबाकी भरल्याशिवाय वीज जोडली जाणार नाही, अशी ताठर भूमिका घेतल्याने राजूरकरांवर पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची नामुष्की ओढवली आहे.
या ग्रामपंचायतीला दर महिन्याला चार ते पाच लाखांच्या आसपास वीजबिल येते, तर पाणीपट्टी वसुलीच्या नावाने ठणठण गोपाळ, अशी परिस्थिती आहे. वीजबील, कर्मचारी पगार व वसुली यांचा ताळमेळ बसत नसल्याने थकबाकी वाढत चालली आहे. 2016 साली शासन योजनेनुसार 76 लाख 49 हजार वीजबिल भरूनही शासनाने उर्वरित रक्कम माफ केली नसल्याने त्याचे व्याजही लागून येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची थकबाकी दिवसेंदिवस वाढत जाऊन ती आता दोन कोटी 30 लाखांच्या आसपास पोहोचली आहे.
ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना सध्यातरी पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. वीजबिल थकबाकी नोटीस दहा दिवसांपूर्वी दिली होती. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने वीजपुरवठा खंडित केला असल्याचे महावितरणचे अधिकारी राऊत यांनी सांगितले. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी याप्रकरणी हस्तक्षेप केला आहे. महावितरणचे अधिकारी व ग्रामपंचायत सदस्यांची संयुक्त बैठक आयोजित करून, येत्या चार दिवसांत तीन लाख रुपये भरण्याची तयारी ग्रामपंचायतीने दाखवली. त्यामुळे हा पुरवठा सुरळीतहोईल, असे सांगण्यात आले.
ग्रामपंचायतीचे पाणीपट्टी भरण्याचे आवाहन
मागील तीन वर्षांपासून पाणीपुरवठा सुरळीतपणे चालवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली आहे. मात्र आता ग्रामपंचायतीकडे भरण्यासाठी पैसा नसल्याने वसुली करूनच वीजबिल भरावे लागणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपल्याकडे असलेली थकबाकी भरुन ग्रामपंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहन उपसरपंच गोकुळ कानकाटे यांनी केले आहे.