वाघोली(प्रतिनिधी) : शिरसवडी तालुका हवेली येथील सुनील राणू गावडे यांनी शेती पंपासाठी वीज जोडणी करिता महावितरण कार्यालय उरुळी कांचन यांच्याकडे अर्ज केला होता. विज जोडणी साठी आवश्यक असणारी अनामत रक्कम देखील संबंधित शेतकऱ्याने भरून वीजजोडणीसाठी पाठपुरावा केला परंतु अद्याप पर्यंत महावितरणकडून सदर अर्जानुसार वीजजोडणी मिळाली नाही मात्र त्यांनी केलेल्या अर्जानुसार त्याला पाच हजार तीनशे नव्वद रुपये वीज बिल आले आहे.
वीज बिल आले आहे परंतु वीज कनेक्शन प्रत्यक्ष जागेवर कधी मिळणार व विजेचा वापर शेतीसाठी कधी करणार असा सवाल शेतकऱ्याकडून केला जात आहे. प्रत्यक्षात शेतीसाठी वीज कनेक्शन मिळाले नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान होत आहे.
“शेती पंपाच्या वीज जोडणी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरणचे उंबरे झिजवावे लागतात. दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी अंदाजे बिल दिले जात असल्याने असे प्रकार सर्रास घडत आहेत. शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांची पिळवणूक करणाऱ्या महावितरणच्या अधिकार्यांना काळे फासण्यात येईल.
– संदीप सातव(संघटन सरचिटणीस, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा)
दुसरीकडे विजेचा वापर नसतानादेखील महावितरण कडून संबंधित शेतकऱ्याला विज बिल दिले गेले असल्याने महावितरणचा सावळागोंधळ पुन्हा उजेडात आला आहे. याबाबत महावितरणचे मुळशी विभाग कार्यकारी अभियंता माणिक राठोड यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य तो निर्णय दिला जाईल असे त्यांनी सांगितले.