नवी दिल्ली – इलेक्ट्रिक वाहन ही आपल्यासाठी जागतिक पातळीवर वाढणारी संधी असल्याचे वाहनांचे सुटे भाग निर्माण करणाऱ्या भारत फोर्ज कंपनीने म्हटले आहे.
कंपनीच्या वार्षिक अहवालात कंपनीचे अध्यक्ष बी. एन. कल्याणी यांनी म्हटले आहे की, या क्षेत्रात काम वाढविण्यासाठी कंपनीने 2 दोन छोट्या कंपन्यातील भाग भांडवल विकत घेतले आहे. त्यामुळे कंपनीत या क्षेत्रातील संशोधन आणि विकास वाढण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर कंपनीने स्वतःचे संशोधन आणि विकास केंद्र सुरू केले असून या केंद्रात इलेक्ट्रिक वाहनावर काम केले जाते.
गेल्या दोन वर्षापासून कंपनी या क्षेत्रात मूलभूत काम करीत आहे. या उत्पादनासाठी मनुष्यबळ, भांडवल यामध्ये वाढ करावी लागेल. त्याचबरोबर ही उत्पादने जास्तीत जास्त किफायतशीर दरात उपलब्ध करण्याची गरज आहे. तरच भारतातील सर्वसामान्य लोक या उत्पादनांचा लाभ घेऊ शकतील असे कल्याणी म्हणाले.