लोकप्रतिनिधींचे केवळ आश्वासन; विद्युत पंप सुरू होताच वीजपुरवठा होतो खंडित
नगर (प्रतिनिधी) – शेती पंपांसाठी दिवसा वीज देण्याची अनेक वर्षांची मागणी तर पूर्ण होत नाही. उलट, सध्या तालुक्यात भारनियमनाच्या व्यतिरिक्तही विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. त्यातच, घोटाळा होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे अन् दुरुस्तीसाठी अधिक वेळ जाण्याच्या घटनांची त्यात भर पडत आहे. परिणामी, शेतकऱ्यांमधून महावितरणविषयी नाराजी व्यक्त केली जात असून लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
नगर तालुका भारनियमनमुक्त करण्याच्या घोषणा अनेकदा झाल्या. परंतु त्यात यश आले नाही. तालुक्यात वीज उपकेंद्र उभी राहिली, तरीही शेतकऱ्यांना दिवसा वीज देणे शक्य झालेले नाही. सध्या तालुक्यात भारनियमन सुरू आहे. या भारनियमनानुसार शेतकरी शेतीला पाणी देण्याचे काम करतात. शेतकऱ्यांनी भारनियमनाची सवय लावून घेतली आहे. परंतु, आता भारनियमनाव्यतिरिक्त देखील वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना त्रास होत आहे. यावर्षी मुबलक पाणीसाठा असल्याने शेतकरी पाणी शेतीला देण्यासाठी धडपड करीत आहेत. परंतु, एकाचवेळी अनेक पंप चालत असल्याने वीजपुरवठ्यावर अतिरिक्त भार येऊन वीजपुरवठा अनेकदा खंडित होत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊसाने हजेरी लावल्याने पाणी साठ्यात भर पडली आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकांच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात झाल्या. परिणामी एकाच वेळी विद्यूत पंप सुरु झाल्याने वीज पुरवठा खंडीत होत आहे.
सध्या तालुक्यात शेतीसाठी दोन पाळ्यांमध्ये वीजपुरवठा केला जात आहे. परंतु, यामध्ये रात्री साडे नऊ ते सकाळी साडेसात व दिवसा साडे दहा ते साडे सहा वाजेपर्यंत वीज राहते. त्यातही मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा अनेक वेळा खंडित होतो.
रोहित्र दुरुस्ती, ऑइल भरणे तसेच इतर दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना वर्गणी गोळा करावी लागत आहे. यामुळे शेतकरी चांगलाच कात्रीत सापडला आहे. गेल्यावर्षी पाणी नसल्याने शेतीचे नुकसान झाले, तर यावर्षी विजेच्या लपंडावाने शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागणार की काय? अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीला पूर्ण दाबाने वीजपुरवठा केला जात असल्याचा दावा महावितरणकडून वेळोवेळी केला जातो, परंतु वीजपुरवठ्याविषयी शेतकरी मात्र समाधानी नसल्याचे दिसते. वीजपुरवठ्यावर अतिरिक्त भार आल्याने वीजपुरवठा अनेकदा खंडित होत आहेच, शिवाय अतिरिक्त भारामुळे घोटाळे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. एवढेच नव्हे तर घोटाळा झाल्यानंतर दुरुस्तीसाठी महावितरणचे कर्मचारी अपेक्षित सहकार्य करीत नसल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.