पानशेत (प्रतिनिधी) – सिंहगडावर इलेक्ट्रीक बस सुरू झाल्यास गडावर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गावांतील अनेक तरुणांचा रोजगार जाणार आहे. गावकऱ्यांचे व्यवसायिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी रोजगार उपलब्ध करुन द्यावा. या मागणीकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिकांकडून सिंहगडावर सोमवारी (दि. 11) धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सिंहगडावरील प्रवासी वाहन चालक आणि स्थानिक हॉटेल व्यावसायिक सहभागी झाले होते.
किल्ल्यावर सध्या खासगी प्रवासी वाहतुकीद्वारे अनेकजण व्यवसाय करतात. परिसरातील अधिक करून त्यांच्या कुटुंबीयांचा रोजगार यावर अवलंबून आहे. खरवाडी, थोपटेवाडी, सांबरेवाडी, मोरदरी, मोरवाडी या गावांत वनव्यवस्थापन समित्या 2008 पासून कार्यरत आहेत. स्थानिकांना विश्वासात न घेता वनविभाग आणि सिंहगड प्रशासनाने इलेक्ट्रीक बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पीएमपीएमएलची मदत घेण्यात येणार आहे.
पर्यटकांच्या सोयीसाठी राबवण्यात येणाऱ्या चांगल्या उपक्रमास गावकऱ्यांचा विरोध नाही. परंतु प्रशासनाच्या या निर्णयामुळे वाहनचालकांच्या कुटुंबाबरोबर तसेच 40 हॉटेलचालकांवर याचा थेट परिणाम होणार आहे. संबंधित प्रशासनाने यापैकी कोणालाही पूर्व कल्पना दिली नाही. त्यामुळे याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सिंहगडावर धरणे आंदोलन केले आहे.
यावेळी माऊली कोडीतकर, युवराज पायगुडे, अशोक लोहकरे, मयुर लोहकरे, अक्षय भाडले, राहुल भाडले, सोमनाथ शिरोळे, अतुल भरेकर, उपसरपंच गणेश गोफणे, शेखर चव्हाण, राजू चव्हाण, बापूसाहेब दुधाणे, जालिंदर यादव, महिबूब ककमरी, संतोष मंडले, संदीप लोहकरे, विठ्ठल भरेकर, अनिकेत चव्हाण, अमर जरांडे आदी उपस्थित होते.