पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांनंतर कॉंग्रेसच्या नेतृत्वाचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत विविध राज्यांमध्ये पक्षाला मिळणारे यशापयश पक्षांतर्गत परिस्थितीवर परिणाम करणारे ठरणार आहे. भाजपला शह देण्यासाठी शरद पवार आता तिसऱ्या आघाडीच्या प्रयत्नांत असल्याचे बोलले जाते. ही आघाडी आकार घेईल का? घेतलाच तर कधी आणि कसा घेईल? हे प्रश्न आता अनुत्तरित असले तरी पाच राज्यांमधील निवडणुकांनंतर तिसऱ्या आघाडीची दिशाही निश्चित होऊ शकते.
दोन वेळा कॉंग्रेस सोडणारे आणि दोनदा परतणारे शरद पवार यांची सध्याच्या परिस्थितीवर बारकाईने नजर असणार आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अध्यक्षपद किंवा निमंत्रकपद मिळविण्यात अपयश आल्यानंतर आता पवारांनी तिसऱ्या आघाडीची हवा निर्माण करायला सुरुवात केली आहे. पाच राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकांविषयी बोलताना ते म्हणाले की, देशाला तिसऱ्या आघाडीची गरज आहे आणि अशा आघाडीच्या स्थापनेसाठी विविध राजकीय पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनीही तिसऱ्या आघाडीची गरज असून लवकरच ती आकार घेणार असल्याचे सांगितले आहे.
पवार हे एक चतुर राजकीय नेते आहेत. 2004 ते 2014 पर्यंतची यूपीए सध्या अस्तित्वात आहे की नाही, या प्रश्नाचे उत्तर ते देणार नाहीत. सर्व व्यावहारिक उद्दिष्टांच्या पार्श्वभूमीवर पाहिले असता, ज्या यूपीएचे नेतृत्व सोनिया गांधी यांनी केले होते आणि डॉ. मनमोहनसिंह हे दहा वर्षे पंतप्रधान होते, ती यूपीए आता दिसत नाही, हेच खरे. सुमारे सात वर्षांपासून यूपीएची कोणतीही औपचारिक बैठक झालेली नाही. समाविष्ट पक्ष आले आणि त्यांच्या मर्जीने निघूनही गेले. सोनिया आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने अनेक प्रयोग करून पाहिले. त्यात उत्तर प्रदेशातील 2017 च्या विधानसभा निवडणुकांवेळी अखिलेश यादव यांच्याशी केलेली आघाडी, बिहारमध्ये 2020 मध्ये राष्ट्रीय जनता दलासोबत केलेली महाआघाडी तसेच झारखंड आणि महाराष्ट्रात यशस्वीरीत्या स्थापन केलेले आघाडी सरकार अशा प्रयोगांचा समावेश आहे. परंतु आघाड्यांची ही खिचडी वैचारिक आधारावर नसून, तत्कालीन राजकीय गरजांनुसार झालेली दिसते.
सध्या सर्वांचे लक्ष आसामकडे वेधले गेले आहे. तिथे बदरुद्दिन अजमल यांच्याशी कॉंग्रेसने आघाडी केली आहे. 71 वर्षांचे अत्तराचे व्यापारी अजमल हे एक मौलाना आहेत आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एआययूडीएफ) नेते आहेत. आसाममधील बंगाली मुस्लिमांचे नेतृत्व ते करतात. दक्षिण आसाममधील काही मतदारसंघांमध्ये प्रचंड प्रभावी असलेले अजमल यांचा त्यांच्या अनुयायांवर जबरदस्त पगडा आहे. आसामी लोकांनी अनेक दशकांपासून सीमावर्ती भागात वसलेल्या बांगलादेशी हिंदू आणि मुस्लीम दोहोंना विरोध केला आहे. या लोकांमुळे स्थानिक संस्कृती धोक्यात आली असल्याची भावना आसामी लोकांच्या मनात आहे. त्यामुळे आसामातील निवडणुकांच्या निकालांचा अल्प आणि दीर्घकालीन परिणाम मोठा असणार आहे.
2 मे रोजी कॉंग्रेसला अपयश आलेच आणि बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी सत्ता वाचविण्यात यशस्वी ठरल्याच तर कॉंग्रेसमधील असंतुष्टांचे लक्ष शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्याकडे केंद्रित होऊ शकते. 2 मे नंतर महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक आणि एकंदरितच देशात अनेक ठिकाणी कॉंग्रेसचे राजकारण आज दिसते आहे तसे राहणार नाही. पवारांच्या योजनेनुसार, नव्या तिसऱ्या आघाडीत प्रादेशिक पक्ष सामील होतील आणि राष्ट्रीय स्तरावर पवार त्यांचे नेतृत्व करतील. राष्ट्रवादी कॉंग्रेस सध्या महाराष्ट्रात शिवसेना आणि कॉंग्रेससोबत आघाडी करून सत्तेत आहे. केरळमध्ये राष्ट्रवादी डाव्या आघाडीचा घटक आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबत पवारांचे चांगले संबंध आहेत. याखेरीज समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाशी त्यांचा ताळमेळ चांगला आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या आघाडीत सामील होण्यासाठी पवार तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस), जनता दल (धर्मनिरपेक्ष), आणि वायआरएस यांच्या पक्षाला राजी करू शकतात. त्या-त्या पक्षाच्या स्थानिक हितसंबंधाशी राष्ट्रवादीचा संघर्ष होता कामा नये, एवढीच त्या पक्षांची अट असेल.
ऐंशी वर्षांचे पवार सध्या भारतातील एक मोठी उंची असलेले नेते मानले जातात. व्यावहारिक आणि चतुर नेते असल्यामुळे पंतप्रधानपदासाठी योग्य असणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले आहे. अनेक बाबतीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखी उंची असलेले ते नेते आहेत, असे म्हणता येते. राजकारण आणि क्रिकेटचे मैदानही गाजविल्यानंतर आता पवार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी राज्याराज्यांमधील स्थानिक पक्षांचे विविधरंगी इंद्रधनुष्य साकारण्याच्या विचारात असावेत, असा अनेकांचा कयास आहे. अशी वाटचाल करण्याचे पवारांनी ठरविले असेल तरी त्याची माहिती त्यांच्या कट्टर समर्थकांनाही नसेल. म्हणूनच या पाच राज्यांमधील निवडणुका खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यानंतर कॉंग्रेसच्या नेतृत्वाच्या प्रश्नाचा निकाल लागण्याची शक्यता असून, तिसऱ्या आघाडीची चाचपणी कशी आणि कधी सुरू होणार, याचाही अंदाज त्यानंतरच लागू शकेल.
रशिद किडवई