थोरात : माजी विरोधी पक्षनेते विखे पाटील, पिचड यांच्यावर टीका
संगमनेर – राज्यातील एकमेव पुनर्वसन होऊन नंतर पूर्ण झालेले निळवंडे धरण आहे. 2014 च्या अगोदर आघाडी सरकारच्या काळात निळवंडे पूर्ण होऊन बऱ्याच कामांना चालना मिळाली. दुर्दैवाने युती सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात काहीच काम झाले नाही. विधानसभा जवळ आल्याने काही मंडळी राजकारण खेळू पाहत आहे. कालव्यांची कामे सुरू व्हावी, ही माझी अपेक्षा आहे. यात राजकारण करू नये, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेरात दैनिक प्रभात’शी बोलताना निळवंडे कालव्यांसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. थोरात म्हणाले, निळवंडे कालव्यासाठी अलीकडच्या काळात सरकारकडून काही निधी आला. परंतु त्या निधीतून अकोले तालुक्यातील कालव्यांची कामे सुरू होऊ शकली नाहीत. त्यामुळे एक असंतोष दुष्काळी भागात आहे. केंद्र आणि राज्य सरकाने कालवे भूमिगत होणार नाही, असे स्पष्ट सांगीतले असतांनाही अकोले तालुक्यातील कालव्याची कामे भूमिगत करावीत, या मागणीसाठी आडवून धरण्याची भूमिका पिचडांची योग्य नाही. लोकांच्या काही मागण्या असतील, तर त्या दूर करण्याची जवाबदारी सरकारची आहे. दुर्दैवाने विधानसभा जवळ आल्याने दुष्काळी पट्ट्यात समज-गैरसमज निर्माण करण्याचे काम चालले आहे. विधानसभा जवळ आल्याने काही मंडळी राजकारण खेळू पाहत आहे, अशी टीका त्यांनी आमदार राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता यावेळी केली.
प्रत्येक वेळी मंत्री महोद दोन वर्षांत पाणी देतो म्हणाले. मात्र आता काहीतरी थोडासा निधी मिळाला आहे. अद्याप केंद्राचा निधी मिळाला नाही. बळीराजा योजनेत तर समावेश झाला नाही. परंतु दिशाभूल करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाण्याचा विषय राजकारणाच्या पलीकडे नेऊन त्वरित दुष्काळी भागाला पाणी दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. कालव्यांच्या जमिनीचे संपादन झाले असून, शेतकऱ्यांना पैसे पण देण्यात आले आहे. अकोले तालुक्यात कालवे व्हावेत, या विचाराचे लोक आहेत. असे असताना लोकप्रतिनिधींनी अशी भूमिका घ्यावी, हे योग्य नसल्याचे म्हणत त्यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे.