पिंपरी – कोविडनंतर आता ओबीसी आरक्षणामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका लांबल्या आहेत. साहजिकच आपल्या प्रभागात जम बसवण्याची संधी इच्छुकांना मिळाली आहे. मात्र, तीच आता त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. रोजच्या रोज घरासमोर वर्गणीदारांच्या रांगा लागत असून हा भार कधीपर्यंत सोसावा लागेल, याची चिंता इच्छुकांना सतावू लागली आहे.
सुरुवातीला कोविडमुळे निवडणुका लांबणीवर जाणार, हे निश्चितच होते. त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या. तीनची प्रभाग रचना अंतिम झाली असताना नवीन सरकारने ती रद्द करून पूर्वीप्रमाणे चारचा प्रभाग केला. अजूनही निवडणूक कधी याचा नेम नाही. त्यातच आता गोविंदा, गणपती, आणि नवरात्रौत्सव आल्याने कार्यालयात रोजच वर्गणीदारांची मोठी रांग लागत आहे. मंडळाकडून मोठमोठ्या रकमेची वर्गणी मागितली जात असल्याने नगरसेवकांसह इच्छुकांचा खिसा रोजच हलका होत आहे. ही परिस्थिती कधीपर्यंत राहणार हे निश्चित नसल्याने आता खिसा हलका होत आहे, तर पुढील काही महिन्यांत तिजोरीही रिकामी करावी लागेल, अशी भीती व्यक्त करत आहेत.
आता खर्चाचा मोसम
कोविडनंतर आता क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र खुले झाले असून विविध स्पर्धांना सुरुवात झाली आहे. या स्पर्धाना प्रायोजक म्हणून इच्छुकांना खिसा हलका करावा लागत आहे. त्याचबरोबर गणपतीमध्ये चाकरमान्यांच्या कुटुंबांना गावी जाण्यासाठी काही इच्छुक अल्प दरात बससेवाही उपलब्ध करून देणार आहेत. गणपतीनंतर दसरा आणि दिवाळी हे सण देखील निवडणुकीच्या अगोदर येण्याची शक्यता असल्याने त्याच इच्छुकांचा आणखीनच खर्च वाढणार आहे.
यासाठी करावा लागणार जास्त खर्च
क्रीडा स्पर्धा, श्रावण महिन्यातील सहली आणि देवदर्शन, तसेच समाज मिंदर उभारणी, प्रार्थना स्थळांचा जीर्णोद्धार यासाठी इच्छुकांच्या दारात कार्यकर्ते उभे राहात आहेत. त्यांच्यासाठी अधिकचा खर्च इच्छुकांना करावा लागणार आहे.
नव्यांवर अधिक भार
इच्छुक पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे इच्छुकांना सुरुवातीला आपला चेहरा मतदारांपर्यंत पोहचवावा लागतो. त्यासाठी त्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसते. त्यांना मंडळे, बचतगट, सोसायट्यांसाठी खर्च करावा लागतो. आता निवडणुका लांबणीवर पडल्याने यापुढेही त्यांना असा खर्च आणखी करावा लागणार असल्याने त्यांच्यापुढे पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.