जयपूर -गुजरातबरोबरच राजस्थानमध्येही भाजपने शत-प्रतिशत कामगिरी केली. विशेष म्हणजे, राजस्थानात विरोधी बाकांवर बसत असूनही त्या राज्यात भाजप आणि मित्रपक्ष राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने लोकसभेच्या सर्वच्या सर्व 25 जागांवर बाजी मारली.
अवघ्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारत कॉंग्रेसने राजस्थानची सत्ता हस्तगत केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून चांगली कामगिरी होण्याची अपेक्षा होती. मात्र, भाजपने मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही सर्व जागा पटकावल्या. भाजपने 24 जागांवर तर मित्रपक्षाने उर्वरित जागेवर विजय मिळवला. तो निकाल मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासाठी मोठाच हादरा मानला जात आहे.
गेहलोत यांना तर निकालाने दुहेरी झटका दिला. त्यांचे पुत्र वैभव यांना लोकसभा निवडणुकीत पराभूूत व्हावे लागले. राजस्थानमधून विजय मिळवणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड आणि गजेंद्रसिंह शेखावत या केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. राजस्थानमधील निकाल माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या नेत्या वसुंधरा राजे यांच्या दृष्टीने दिलासादायक आहे.