नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 2 जागांचा समावेश आहे. छत्रपती उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे दोघंही लोकसभेवर निवडून गेल्यानं राज्यात राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्या जागांवर आता निवडणूक पार पडणार आहे.
निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यसभेच्या एकूण बारा जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी 14 ते 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तर 26 ॲागस्टला अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. तर 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश
दरम्यान महाराष्ट्रात राज्यसभेच्या दोन जागा रिक्त आहेत. ज्यामध्ये छत्रपती उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल हे दोघंही लोकसभेवर निवडून गेल्यानं दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या दोन्ही जागा भाजपच्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी भाजप कोणाला उमेदवारी देते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. तसेच ही निवडणूक बिनविरोध होते का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.