कोरेगाव भीमा (वार्ताहर) – कोरेगाव भीमा येथील जय मल्हार पॅनल व भैरवनाथ ग्राम विकास पॅनल यांच्यामध्ये रंगतदार लढत होणार असल्याचे दिसत आहे. कोरेगाव भीमा ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक वॉर्ड क्रमांक पाचमध्ये ओबीसी या जागेसाठी जय मल्हार पॅनलकडून मनिषा संपत गव्हाणे व भैरवनाथ ग्राम विकास पॅनलच्या राजश्री महेंद्र भांडवलकर यांच्यात सरळ सरळ समोरासमोर लढत होणार आहे.
यापूर्वी जय मल्हार पॅनलच्या सात जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत तर वॉर्ड 5 मधील 2 उमेदवारांना समोरच्या उमेदवारांनी बिनशर्त जाहीर पाठिंबा दिल्याने आता फक्त निवडणुकीची औपचारिकता राहिली आहे. वॉर्डमधील मुख्य उमेदवारच एकत्र आल्याने निवडणूक वातावरण खेळीमेळीचे झाले आहे. निवडणुकीचा ताणतणाव बराच कमी झाल्याचे दिसत आहे. वॉर्ड पाचमधील उमेदवार गावकी-भावकी याचे मुद्दे करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर येथील उमेदवार प्रचार करताना दिसत आहेत.
वॉर्ड क्रमांक 5 बिनविरोध करण्यासाठी कैलासराव सोनवणे, अनिल काशिद, अरविंद गव्हाणे, मुरलीधर गव्हाणे यांनी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले आहेत. वॉर्ड क्रमांक 5 मधील दोन जागांना पाठिंबा दिला असल्याने याठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव या गटात जय मल्हार पॅनलच्या मनिषा संपत गव्हाणे व भैरवनाथ ग्राम विकास पॅनलच्या राजश्री महेंद्र भांडवलकर यांच्यात सरळ सरळ लढत होणार आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्याबाबत नागरिकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
मास्टर प्लॅन सत्यात उतरवणार -मनिषा गव्हाणे
सध्या वॉर्ड क्रमांक पाचसह कोरेगाव भीमाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आराखडा बनवण्यासाठी उच्च शिक्षित व विविध समाज घटक एकत्र येत मास्टर प्लॅन बनवत आहेत. पाच वर्षे वॉर्ड क्रमांक 5सह कोरेगाव हे आदर्श व अत्याधुनिक सोयी सुविधा असलेलं गाव व विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण, तंत्रज्ञान, कौशल्य विकास, विविध कलागुणांचा विकास, तरुणांना रोजगार, सामाजिक आरोग्य, आर्थिक साक्षरता याविषयी मोठ्या प्रमाणावर मास्टर प्लॅन बनवत असून लवकरच तो सत्यात उतरवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे उमेदवार मनीषा संपत गव्हाणे यांनी सांगितले.