सातारा – विधान सभा निवडणुका मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज आढावा बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी सुनलि थोरवे, निवडणूक उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग-ठाकूर, प्रांताधिकारी, तहसीलदार व नोडल अधिकारी उपस्थित होते.
श्वेता सिंघल म्हणाल्या, आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणूक प्रक्रियेचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर आवश्यक उपाययोजना कराव्यात. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रांची पाहणी करून सोयीसुविधांचा आढावा घ्यावा. दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी तळमजल्यावर मतदान केंद्रे ठेवावीत. जिल्ह्यातील एकूण मतदार, मतदान केंद्रे, एक खिडकी योजना, समाधान ऍप, दिव्यांग मतदारांची संख्या, निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ, मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, आदर्श आचारसंहितेचे पालन यावर बैठकीत चर्चा झाली.