नगर -सोलापूर विभागीय रेल्वेच्या विभागीय प्रवाशांच्या अडचणींच्या निवारणासाठी असलेल्या समितीच्या (सोलापूर विभागीय रेल्वे युझर्स कंन्सल्टेटिव्ह कमिटी) सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते, घर घर लंगर सेवेचे प्रणेते, उद्योजक हरजितसिंह वधवा यांची निवड झाली आहे. त्यांची नियुक्ती मराठा चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ऍग्रीकल्चर मार्फत झाली आहे. ही निवड सन 2020 ते 2022 अशा दोन वर्षांसाठी आहे.
या समितीवर वधवा यांची पाचव्यांदा निवड झाली आहे. वधवा अनेक वर्षांपासून सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी आणि दोन वेळेस सेंट्रल रेल्वेच्या झोनल कंन्सल्टेटिव्ह कमिटी सदस्यपदी ही कार्यरत होते. आतापर्यंत त्यांनी रेल्वेच्या सुविधांबाबत अनेक प्रश्न उपस्थित करून ते मार्गीही लावले आहेत. त्यात नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम, नगरच्या स्टेशनचे सुशोभीकरण, तेथील सुविधा, अनधिकृत विक्रेत्यांचा प्रश्न, तत्काळ तिकिटातील गैरव्यवहार, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच नगरला न थांबणाऱ्या गाड्यांना थांबा मिळण्याबाबतचा प्रश्न आदी विषयांवर ते सातत्याने आवाज उठवत आहेत.
शिर्डी-नगर-मुंबई फास्ट पॅसेंजरला सात ऐवजी 18 डबे जोडावेत, तसेच नगर ते पुणे दरम्यान इंटरसिटी ट्रेन सुरू व्हावी या करीता ते सतत पाठपुरावा करून, त्यांनी अशी मागणी वेळोवेळी रेल्वेकडे सादर केली आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यामार्फत रेल्वेशी संबंधित एखादा उद्योग नगरमध्ये आणण्यासाठी तसेच नगर पुण्यासाठी इंटरसिटी करीता त्यांचा पाठपुरावा देखील सुरु असल्याने लवकरच ते आपल्या सर्वांसाठी फायद्याचा होईल, असा विश्वास वधवा यांनी व्यक्त केला आहे.