मुंबई :- एकनाथ शिंदे यांचे सरकार येऊन 25 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला. यावेळात केवळ दिल्ली वाऱ्या करणे, शिवसेनेच्या फुटीर गटातील मतभेट मिटवणे, त्यांच्या समजूती घालणे तसेच उपमुख्यमंत्रीपद घ्यावे लागल्याने निराश असणारा भाजप पक्ष या सर्व व्यापातून 92 नगरपालिका आणि चार नगरपंचायतींमधील ओबीसी आरक्षणाकडे लक्ष देण्यास नव्या सरकारला वेळ मिळाला नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने बांठिया समितीची नेमणूक केली. या बांठिया समितीने दिलेला अहवाल सुप्रीम कोर्टात मान्य होऊनदेखील 92 नगरपालिकांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण मिळाले नाही हे धक्कादायक आहे.
दिल्ली वाऱ्या व अंतर्गत मतभेद यातून जर्जर झालेल्या नव्या सरकारने ओबीसी आरक्षणाकडे लक्ष दिले असते तर हे आरक्षण निश्चित मिळाले असते, असे जयंत पाटील यांनी सांगितले.