मुंबई : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. लवकरच या निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम घोषित होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच यामुळं सुटला आहे. कारण 27 मे पूर्वी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी निवडणुका होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीखही जाहीर केली आहे. येत्या 21 मे रोजी मुंबईत ही निवडणूक होणार आहे.
राज्यातील विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणुका घेण्यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक आज झाली. या बैठकीत विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान कोरोनाबाबतचे सगळे निर्बंध पाळण्याचं तसंच सुरक्षित निवडणूक घेण्याचं असं आयोगानं म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या विधानपरिषद निवडणुकीबाबत या बैठकीत जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी विधानपरिषदेची निवडणूक होणे आवश्यक आहे. कोरोना संकटानंतर या 9 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने काल राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील 9 जागा भरण्याची विनंती केली होती.
दरम्यान आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जात भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये 20 मिनिटं चर्चा झाली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मुख्य सचिव अजॉय मेहता, स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते. काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती भारतीय निवडणूक आयोगाला केली होती.