उमेदवारांकडून होतोय प्रभावी वापर : बहुतांश उमेदवारांच्या वॉर रुम
पिंपरी – सध्याचे युग हे सोशल मीडियाचे आहे. सोशल मीडियाचा सर्वच क्षेत्रात अत्यंत प्रभावीपणे वापर केला जात आहे. मागील काही निवडणुकांपासून राजकीय पक्ष आणि उमेदवारही सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करीत असल्याने आता निवडणूक विभागाकडूनही सोशल मीडियाकडे लक्ष दिले आहे. सोशल मीडियावरुन प्रसारित होणारी जाहिरातील, मजकूर यावर जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण सनियंत्रण समितीचा वॉच असणार आहे.
मागील वेळी म्हणजेच 2014 साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून सोशल मीडियाचा राजकीय पक्षांकडून प्रभावीपणे वापर सुरु असल्याचे दिसत आहे. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करण्यास सुरुवात झाली. अलिकडच्या काळात तर उमेदवारांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यासाठी बहुतांश उमेदवारांनी मतदारापर्यंत सोशल मीडियाद्वारेच पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी उमेदवारांनी वॉर रुम तयार केल्या आहेत. या रुममधून वेगवेगळे मजकूर फेसबुक, व्हॉट्स ऍप तसेच विविध सोशल साईटवर प्रसारित केले जात आहेत.
सोशल मीडियावरुन सामान्य मजकूर प्रसारित केला असल्यास त्याला आक्षेप घेतला जाणार नाही; पण त्यामध्ये विशिष्ट समाजविघातक, विशिष्ट एखाद्या व्यक्तीच्या विरोधात मजकूर असल्यास त्यावर बंधन घालण्याचा अधिकार जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण सनियंत्रण समितीला देण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने उमेदवारांकडून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात
होणार आहे.
त्यासाठी प्रचाररथाचा वापरही मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. या प्रचाररथासाठी उमेदवारांनी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मतदारांपर्यत जलदगतीने पोहचण्यासाठी चित्रफीत आणि ध्वनिफीतींचा वापर उमेदवारांकडून सुरु आहे. त्यासाठी स्क्रीनच्या माध्यमाचा उपयोग होत आहे. यासाठीही परवानगीची आवश्यकता आहे. या माध्यमातील मजकूर तपासूनच त्याला परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, अनेक उमेदवारांकडून सर्वाधिक वापर हा सोशल मीडियाचाच होत आहे. त्यामुळे, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या मजुकरावर आता नजर राहणार आहे.
आक्षेपार्ह पोस्टवर लक्ष – उमेदवाराला प्रचारासाठी केवळ बारा दिवसाचा अवधी मिळाला आहे. त्यामुळे, उमेदवार मतदारापर्यंत पोहचण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवताना पहायला मिळत आहेत. अशा स्थितीत सोशल मीडियाचा वापरही वेगवेगळ्या अकाऊंवरुन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे, प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टवर नजर ठेवण्यात येत असून आक्षेपार्ह पोस्ट कोणीही करु नये, यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.