नवी दिल्ली – आंध्रप्रदेशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत मोठे गेैरव्यवहार झाले असून इलेक्ट्रॉनिक वोटींग यंत्रातही अनेक गडबडी झाल्या आहेत. या संबंधात तक्रारी देऊनही काही उपयोग झाला नसून निवडणूक आयोग पंतप्रधानांच्याच इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप आंधप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व तेलगु देसम पक्षाचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. या संबंधात आम्ही केलेल्या तक्रारींची दखल निवडणूक आयोगाने घेतली नाही तर धरणे धरण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. आंध्रप्रदेशात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया 11 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात पार पडली आहे.
आंध्रातील किमान 150 मतदान केंद्रात इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रांमध्ये घोळ झाल्याचे निष्पन्न झाले असून तेथे फेर निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या संपुर्ण निवडणूक प्रक्रियेच्या काळात निवडणूक आयोगाने आम्हाला काहीहीं सहकार्य केले नाही. वास्तविक ही संस्था स्वायत्त संस्था आहे पण ती सध्या पंतप्रधानांच्या इशाऱ्यावर काम करताना दिसत आहे असा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की राज्याचे मुख्य निवडणूक आधिकारी गोपालकृष्ण द्विवेदी हे ज्या मतदान केंद्रावर मतदान करण्यात गेले होते तेथील मतदार यंत्रही नीट चालत नव्हते असा अनुभव आला आहे असे ते म्हणाले. ज्या दिवशी मतदान झाले त्याच दिवशी आम्ही निवडणूक आयोगाला फेर मतदानाची मागणी करणारा अर्ज पाठवला आहे असे नायडू यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.