कोलकाता – नंदीग्राम मतदार संघातील निवडणूक गैरप्रकाराच्या संबंधात ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दिली होती. तथापि ही तक्रार आयोगाने फेटाळली असून ममतांवरच त्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. ममतांनी दिलेल्या तक्रारीत काहीही तथ्य आढळून आले नाही त्यामुळे आता आम्हीच त्यांच्यावर कारवाईचा विचार करीत आहोत असे आयोगाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
नंदीग्राम मधील एका मतदान केंद्रावर मतदारांना अडवले जात असल्याच्या माहितीवरून ममता बॅनर्जी तिकडे गेल्या. मतदान प्रक्रिया सुरू असताना त्यांनी तेथे दोन तास मुक्काम ठोकला होता. त्यामुळे त्या मतदान केंद्राच्या परिसरात कायदा आणि सुव्यस्था स्थितीचा प्रश्न निर्माण झाला.
या प्रकरणात त्यांनीच मतदान केंद्रावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आणि तेथे भाजपच्यावतीने मतदारांना धमकावण्यात येत असल्याचा आरोप करून निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. पण त्या मतदार केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच त्यांनी आपल्या सुरक्षा यंत्रणेसह त्या केंद्रात प्रवेश करणेच आक्षेपार्ह होते असे आयोगाच्या चौकशीत आढळून आले आहे. या साऱ्या घटनाक्रमात कोणत्या नियमांचा भंग झाला आणि निवडणूक आचार संहितेचा भंग झाला याची माहिती घेतली जात आहे असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक आयोग अमित शहा यांच्या तालावर नाचत असल्याची तक्रार ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाने सातत्याने केली आहे आम्ही केलेल्या प्रत्येक तक्रारीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याचेही तृणमुल कॉंग्रेसचे म्हणणे आहे.