मात्र दुष्काळ निवारणाच्या कामाच्या प्रसिद्धीस मनाई
मुंबई – राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय निवडणूक आयोगाने दुष्काळ निवारणाच्या कामाला परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे, अशा ठिकाणी कामे करण्यास बंधन नाही. मात्र, केलेल्या कामाच्या प्रसिद्धीला मनाई केली असून याचा राजकिय फायदा घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, अशी तंबीही आयोगाने राज्य सरकारला दिली आहे.
राज्यात लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरु असतानाच राज्याच्या ग्रामीण भागात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांना पिण्याचे पाणी नाही, जनावरांना चारा नाही, अशा परिस्थितीमुळे नागरीकांचे प्रचंड हाल झाले होते. पण निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे सरकारचेही हात बांधले गेले होते. राज्यातील चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्राद्वारे राज्यातील आचारसंहिता शिथील करण्यासाठी विनंती केली होती. त्यानंतर दोनच दिवसांपुर्वी राज्यमंत्रीमंडळाची बैठक घेऊन त्यांनी दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावाही घेतला होता. पालकमंत्री दुष्काळी भागांच्या दौऱ्यावर रवानाही झाले आहेत. आयोगाने परवानगी दिली नाही तरी लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या आधिकारात आम्ही दौरे करू व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करू असेही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आता निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दुष्काळ निवारणासाठी परवानगी देताना त्याबाबत प्रसिद्धीला मात्र मनाई केली आहे.