मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी बोलताना त्यांनी या प्रश्नावर चर्चेमधून तोडगा निघू शकतो असे म्हटले तसेच हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत असून एकनाथ शिंदेंचा प्रश्न हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असून त्यांच्याकडून आमच्याशी संपर्क साधण्यास आसल्यास चर्चा करु,आज सायंकाळी मी मुंबईला रवाना होणार आहे. सायंकाळी मुंबईमध्ये बैठक होईल अशी शक्यताही पवारांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या दिल्लीत असणाऱ्या शरद पवार यांनी आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पवारांनी, मविआ सरकार बनण्यापूर्वी अशाप्रकारची बंडाळी झाली होती याची आठवण करुन देताना, ‘यामधून काही नाही काही रस्ता निघेल याची मला खात्री आहे,’ असे म्हटले आहे.
पुढे शरद पवारांनी, “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचं ते बोललेत हे मला माहिती नाही. तुमच्याकडूनच मला हे समजतंय,” असे सांगितले. तसेच शरद पवारांनी, या सरकारमधील मुख्यमंत्री पदाची जबाबदारी शिवसेनेकडे आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आणि इतर पदं काँग्रेसकडे आहेत, असे सांगितले. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासंदर्भातील निर्णय घ्यावा असे सूचित करतानाच दुसरीकडे सध्या राज्यात नेतृत्व बदलाची गरज नाही असेही पवार यांनी म्हटले आहे.