मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे बंडखोरी केल्यानंतर आपल्यासोबत 46 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळ महाराष्ट्राच राजकारण ढवळून निघालं आहे. यावर आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्याला आता एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून म्हटलं की, गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला, आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत असल्याचं शिंदे यांनी म्हटलं.
एकनाथ शिंदे पुढं म्हणाले की, पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. तसेच महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचं असल्याचं देखील शिंदेंनी नमूद केलं.
१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. #HindutvaForever
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
तत्पूर्वी, उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या शिवसैनिकांना असं वाटत असेल की मी शिवसेनेचं नेतृत्व करायला नकोय, त्यांनी मला सांगावं. मी शिवसेना प्रमुख पद सोडायला तयार आहे, पण हे मला समोरासमोर सांगा. संकटाला सामोरं जाणारा शिवसैनिक आहे. म्हणून शिवसैनिकांनी मला सांगावं मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे. पण मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असेल तरच, असंही उद्धव यांनी स्पष्ट केलं.