दिल्ली – महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना विरुद्ध शिंदे गटाच्या सुनावणीवर आज सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. उद्धव ठाकरे यांच्यावतीने आज न्यायालयात वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. यावेळी दोन्हीही वकिलांकडून जोरदार दावे प्रतिदावे करण्यात आले.
कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील मुद्दे
कपिल सिब्बल यांनी आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यावर जोर देत युक्तिवाद केला. यावेळी सिब्बल यांनी शिंदे गटाचे दावे खोडून काढले.
विधिमंडळात आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे म्हणता येणार नाही. विधिमंडळात बहुमत म्हणजे अवघा पक्ष त्यांचा असं होऊ शकत नाही. मग अशा बहुमताच्या जोरावर सरकारे पाडली जातील.
त्यामुळे दहाव्या परिशिष्टाला अर्थ राहणार नाही, असं कपिल सिब्बल कोर्टात म्हणाले.
त्यानंतरही शिवसेनेतून बाहेर गेलेल्या नेत्यांनी भाजपमध्ये किंवा इतर पक्षात विलीन होणं अथवा नवा पक्ष स्थापन करणं हाच पर्याय असल्याचं सिब्बल यांनी म्हटलं.
हरीश साळवे यांच्या युक्तिवादातील प्रमुख मुद्दे
शिंदे गटाच्या वकिलांनी उद्धव ठाकरेंच्या वकिलांचे दावे खोडून काढले.
आम्ही मुळात शिवसेनेतून बाहेरच पडलो नाहीत. त्यामुळे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा प्रश्नच येत नाही.
तसेच आमदारांविरोधात व्हिप उल्लंघन केल्याचं म्हटलं जातंय, मात्र विधिमंडळ बैठकीत व्हिप लागू होतो. पक्षाच्या बैठकीसाठी नाही.
पक्षांतर बंदी कायद्याचा उल्लेख केला जातोय. मात्र त्यासाठी पक्ष सोडावा लागतो. शिंदे गटाने अद्याप शिवसेना सोडलेली नाहीये. हे देखील हरीश साळवे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.
एखाद्या गटाला पक्षाचे नेतृत्व मान्य नसेल तर तसे सांगण्यात काय गैर आहे? नेत्याने विश्वास गमावल्यानंतर पक्षांतर बंदी कायद्याचा आपल्याच सदस्यांविरोधात वापर करणं चुकीचं आहे.
आमदारांच्या अपात्रतेपासून ते शिवसेना पक्ष अशा महत्वाच्या बाबींवर दोन्हीही वकिलांनी आपली बाजू मांडली. दोन्हीही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वकिलांसमोर काही प्रश्न उपस्थित केले. या खटल्याची सुनावणी उद्या म्हणजेच ४ ऑगस्ट रोजी होईल असे न्यायालयाने सांगितले.