गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यपूर्ण राजकीय घडामोडीबाबत सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी आणखी आठवडाभर पुढे ढकलली गेली असल्याने आणखी काही दिवस अनिश्चितता राहणार आहे. दुसरीकडे, शिवसेना पक्षांतर्गत राजकीय संघर्ष मात्र पाहावा लागणार आहे. मुळात शिवसेनेतील फूट हा या संपूर्ण राजकीयनाट्याचा मुख्य विषय असल्याने आगामी कालावधीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या स्थितीवर चर्चा रंगणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विविध राजकीय नेते शिवसेना सोडून जात असताना ज्या प्रकारची विधाने करत आहेत ते पाहता शिवसेनेच्या या परिस्थितीला निश्चित जबाबदार कोण, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.
कोकणातील महत्त्वाचे नेते रामदास कदम यांनी दोन दिवसांपूर्वी वृत्तवाहिन्यांशी बोलताना ज्या प्रकारची विधाने केली ती विधाने असोत किंवा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे बारा खासदार असोत, त्यांनी असा निर्णय घेण्यामागे त्यांची मानसिकता कोणती होती याचा विचार आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना करावाच लागणार आहे. जेव्हा शिवसेनेचे 12 खासदार नवी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसून पत्रकार परिषद घेत होते तेव्हा मुंबईमध्ये एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीला भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्याशी युती केल्यामुळे आम्हाला बाजूला होण्याचा निर्णय घ्यावा लागला अशीच सर्वसाधारण प्रतिक्रिया बंड करणाऱ्या बहुतांशी नेत्यांनी व्यक्त केली आहे. सध्याच्या परिस्थितीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार हेच जबाबदार असल्याचा थेट आरोप रामदास कदम यांनी केला आहे. अशाच प्रकारचे आरोप इतर नेत्यांनीही केले आहेत.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याभोवती कोंडाळे करून बसलेल्या काही नेत्यांमुळेच शिवसेनेची अशी परिस्थिती झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी भेट घेणे सोपे नव्हते. आमदार-खासदार असूनही आम्हाला अनेक वेळा ताटकळत ठेवण्यात येत होते, असा थेट आरोप सर्व आमदार-खासदारांनी केला आहे. तसेच पक्ष प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या विधानांमुळेसुद्धा शिवसेनेची अशी स्थिती झाल्याचा दावा करण्यात येत आहे. हे सर्व प्रकारचे आरोप होत असतानाच उद्धव ठाकरे यांनी मात्र या सर्व परिस्थितीला भाजपाला जबाबदार धरले आहे. खरेतर आजपर्यंतचा राजकीय इतिहास पाहता ज्या पक्षामध्ये दरबारी राजकारण रंगत असते त्या पक्षाला कधी ना कधी अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. आतापर्यंत शिवसेनेमध्ये जेव्हा जेव्हा फूट पडली तेव्हा प्रत्येक वेळेला शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेल्या व्यक्तींभोवती असणाऱ्या ठराविक नेत्यांबाबत आक्षेप घेण्यात आला होता. छगन भुजबळ जेव्हा शिवसेना सोडून बाहेर पडले तेव्हा त्यांनी मनोहर जोशी आणि इतर काही नेत्यांबाबत आक्षेप व्यक्त केला होता. त्यानंतर नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांनी बाळासाहेबांच्या भोवती असलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांबाबत आक्षेप व्यक्त केला होता. अशाच प्रकारचा आक्षेप शिवसेना सोडताना राज ठाकरे यांनीही घेतला होता. माझा संघर्ष विठ्ठलाशी नसून त्या विठ्ठलाभोवती असणाऱ्या बडव्यांशी आहे, असे जाहीर विधान तेव्हा राज ठाकरे यांनी केले होते.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार आणि खासदारांनी जेव्हा बंड केले तेव्हा पुन्हा एकदा पक्षप्रमुखांना भेटण्यास यश मिळत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये जेव्हा या घडामोडी घडत होत्या त्यानंतर एक पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे जास्त जागृत झाल्याचे दिसत आहे. या कालावधीमध्ये त्यांनी विभागप्रमुख असो, शाखाप्रमुख असो किंवा महिला आघाडीच्या नेत्या असो या सर्वांसोबत बैठका घेतल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा दौराही करणार आहेत. म्हणजे ज्या गोष्टी खरे तर पूर्वी करणे अपेक्षित होते ते उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य आता करत आहेत. पक्षाच्या प्रमुख नेत्याशी आपल्याला सहज संपर्क साधता यावा अशी भावना सर्वसाधारण कार्यकर्त्यांची असतेच तसेच आमदार-खासदारांनाही मुख्यमंत्र्यांनी किंवा आपल्या पक्षाच्या प्रमुखाने आपली कामे करावीत असे वाटत असते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेला व तळागाळातील शिवसैनिकांना त्याचा कोणताच फायदा झाला नाही, अशी सार्वत्रिक भावना निर्माण झाली आहे, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
एकीकडे अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते ज्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार गेल्या निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते त्या उमेदवारांना राजकीय ताकद देण्याचे काम करत असताना त्याच मतदारसंघातून विजयी झालेल्या शिवसेनेच्या आमदारांची मात्र गोची होत होती. पराभूत आमदाराला निधी आणि सहकार्य मिळत होते; पण निवडून आलेल्या आमदाराकडे दुर्लक्ष होत होते अशी परिस्थिती असल्याचे बंडखोर आमदारांनी सांगितले आहे. सामान्य शिवसैनिक आणि आमदार-खासदारांची ही भावना अनेकांनी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला होता; पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले असेही बंडखोरांचे म्हणणे आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मागितली होती. त्यानंतर शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीशी आघाडी करून महाविकास आघाडीचा प्रयोग समोर आणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. आगामी निवडणुकीमध्ये मते कोणत्या जीवावर मागायची हा प्रश्न निर्माण झाला म्हणूनच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडून पुन्हा एकदा भाजपाच्या साथीने सरकार स्थापन करावे, हीच मागणी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वच आमदारांनी लावून धरली होती.
एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या खासदारांचे नेते राहुल शेवाळे यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये जे गौप्यस्फोट केले ते पाहता उद्धव ठाकरे यांचीसुद्धा मानसिकता तशी तयार झाली होती; पण त्यानंतर घडलेल्या काही राजकीय घटनांमुळे भाजपचे नेते नाराज झाले आणि ही युती पुन्हा प्रत्यक्षात येऊ शकली नाही. पण आमदार आणि खासदारांना भाजपासोबत जायचे असल्यानेच हे बंड प्रत्यक्षात आले, हेही वास्तव आहे. अर्थात, गेल्या महिन्याभरातील घडामोडी पाहता शिवसेना निश्चितच अडचणीत आली आहे. याला जबाबदार कोण, याचा शोध घेतानाच पक्षसंघटना पुन्हा रुळावर कशी येईल यासाठीसुद्धा आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना नजीकच्या कालावधीमध्ये काम करावे लागणार आहे.