Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात आपली ताकद अधिक मजबूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मोठा संघटनात्मक निर्णय घेतला आहे. राज्यभर विभागीय संपर्क प्रमुख आणि सह-संपर्क प्रमुखांची घोषणा करत पक्षाने तळागाळात विस्तार करण्याची रणनीती स्पष्ट केली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षाच्या अधिकृत निवेदनानुसार, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांना अनुसरून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, तीन विद्यमान कॅबिनेट मंत्र्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंत्री भरत गोगावले यांच्याकडे उत्तर कोकण विभागाची धुरा देण्यात आली असून, आमदार किरण सामंत दक्षिण कोकणाचा कारभार पाहणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रासाठी माजी आमदार दगडू सकपाळ यांची संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून, हनुमंत जगदाळे यांना सह-संपर्क प्रमुख करण्यात आले आहे. मराठवाड्याची जबाबदारी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे देण्यात आली आहे. विदर्भातही मोठे बदल करण्यात आले असून, माजी मंत्री दीपक सावंत यांच्याकडे पूर्व विदर्भ (नागपूर, भंडारा, गोंदिया) सोपवण्यात आला आहे. तर आमदार डॉ. मनीषा कायंदे यांच्याकडे वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीचा कार्यभार देण्यात आला आहे. पश्चिम विदर्भासाठी मंत्री संजय राठोड यांची संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, पराग पिंगळे यांना सह-संपर्क प्रमुख करण्यात आले आहे. या नियुक्त्यांमधून कोकणापासून विदर्भापर्यंत अनुभवी आणि प्रभावी नेत्यांवर विश्वास दाखवण्यात आला आहे. या मोठ्या फेरबदलांमधून शिंदेसेनेने स्पष्ट संदेश दिला आहे की, आगामी निवडणुका आणि राजकीय आव्हानांसाठी पक्ष सज्ज आहे. संघटना मजबूत करून कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचा हा मोठा प्रयत्न मानला जात असून, राज्यातील राजकारणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.