मुंबई : शिवसेना वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांसह सूरत गाठले आहे. त्यामुळे सरकार कोसळतं की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. आता यावर दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे ट्विट करून म्हटलं होतं की, आम्ही बाळासाहेबांचे खंबीर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आपल्याला हिंदुत्व शिकवले आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणुकीबाबत आम्ही कधीही फसवणूक केली नाही आणि सत्तेसाठी कधीही फसवणूक करणार नाही, असंह ट्विट शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळे ते पुढं काय करणार याची अंदाज लागणे कठीण झालं आहे.
एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेवर केदार दिघे यांनी खंत व्यक्त केली. दिघे साहेबांची शिकवण असलेल्या नेत्याकडून असं होणं अपेक्षित नाही. दिघे साहेब असते तर असं घडलंच नसतं. त्यांनी संघटनेशी गद्दारी सहनच केली नसती. एकनाथ शिंदे १०० टक्के चुकले, असंही केदार दिघे यांनी म्हटलं.