मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले भावनिक आवाहन देखील बंडखोर आमदारांचे मत परिवर्तन करण्यात अपयशी ठरल्याचं चित्र आहे. बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आता सेनेच्या ३७ आमदारांचा पाठिंबा असल्याचं बोललं जात असून ते लवकरचं भाजपसोबत सत्तास्थापनाचा प्रस्ताव राज्यपालांकडे सुपूर्द करतील अशी माहिती मिळत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामधे सध्या ३७ या आकड्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. याच कारण असं की सेनेचा बंडखोर आमदार गट जोपर्यंत ३७ हा आकडा गाठत नाही तोपर्यंत त्यांच्यावर पक्षबंदी कायद्याअंतर्गत कारवाईची टांगती तलवार असणार आहे.
अशातच, बुधवारी रात्री शिंदे गटामध्ये सेना आमदार गुलाबराव पाटील हे देखील सामील झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये पाटील उपस्थित होते. मात्र बैठक संपताच त्यांनी थेट बंडखोर आमदारांचा कॅम्प गाठला. यावेळी त्यांच्यासोबत सेना आमदार योगेश कदम तसेच अपक्ष आमदार मंजूळा गावित आणि चंद्रकांत पाटील हे देखील शिंदेंच्या गटात सामील झाले.
दरम्यान, शिंदे गटाला जोपर्यंत सेनेच्या ३७ आमदारांचे पाठबळ मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या सर्व हालचाली गुवाहाटी येथूनच चालणार आहेत. सेनेचे ३७ आमदार फोडण्यात यश आल्यानंतर त्यांना गोवा मार्गाने मुंबईत आणाल जाईल अशी माहिती विश्वनीय सूत्रांनी दिली होती. अशातच आता शिंदे गटाकडे सेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले एकूण ३७ आमदार असल्याचं बोललं जात आहे. यामुळे एकनाथ शिंदे लवकरच गोवामार्गे मुंबईत राज्यपालांशी संपर्क साधतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
३७ आमदारांचा पाठिंबा मिळाला तरी शिंदे यांच्या समोरील सर्वात मोठी अडचण
एकीकडे ३७ आमदारांच्या जुळवाजुळवीसाठी शिंदे गटाने हालचाली केलेल्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं दिसत असलं तरी त्यांच्या अडचणी इथेच संपत नाहीत. राज्यपालांकडे समर्थक आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र दिल्यानंतर सभागृहाच्या पटलावर बहुमत सिद्ध करताना शिंदेंची कसोटी लागणार असल्याचं बोललं जातंय. शिवसेनेचा अभेद्य गड राहिलेल्या मुंबईमध्ये सेना आमदार आल्यानंतर ते शिंदे यांच्या पाठीशी उभे राहतील का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय.