मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली होती. ‘औरंगजेब क्रूर शासक होता, आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत,’ असे वक्तव्य सपकाळांनी केले होते. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या विधानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खरपूस समाचार घेतला आहे. हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली, काय केले म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली?, औरंगजेब कुठे, देवेंद्र फडणवीस कुठे, जनाची नाही तर मनाच तरी ठेवा, असा हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी केला.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे म्हणाले, हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना केली. हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली, काय केले म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली?, औरंगजेब कुठे, देवेंद्र फडणवीस कुठे, जनाची नाही तर मनाच तरी ठेवा, असा पलटवार एकनाथ शिंदेंनी केला. तसेच औरंगजेबची कबर ही महाराष्ट्राला लागलेले कलंक आहे. हा कलंक पुसला पाहिजे ही लोकांची भावना आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
नागपूरमध्ये जमावाने काही घरांना लक्ष केले जाळपोळ केली. मोठ्या प्रमाणात मालमत्तेचचे नुकसान केले. काही लोकं जिवानीशी वाचली. पोलिसांवर दगडफेक झाली. काही लोक जखमी झाले. ही घटना पूर्वनियोजित होती असे दिसतंय. ज्या मोमीनपुरामध्ये घटना घडली तिथे एरवी अनेक गाड्या पार्क असायच्या, मात्र काल त्या नव्हत्या. काही मंदीरातील फोटो जाळले. अग्निशमन दलाच्या जवानांवर हल्ले केले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, पोलिसांवर दगडफेक करणे हे दुदैवी आहे. समाजकंटकांना शोधून कडक कारवाई होईल. नागपूर हे शांतता प्रिय शहर आहे. दोन समाजात तेढ निर्माण केली जात आहे. पोलीस मूळाशी जाऊन तपास करतील. आपण सर्वांनी सहकार्य करावे, शांतता राखावी, असे आवाहन एकनाथ शिंदेंनी केले. हा औरंगजेब या आंदोलनकर्त्याचा कोण लागतो. या आंदोलनकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे, छावा पाहिला पाहिजे. त्याचे समर्थन करणे म्हणजे देशद्रोह्याचे समर्थन करणे आहे. देशाचा द्रोही त्याचे समर्थन म्हणजे देशद्रोहचे समर्थन, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले होते?
औरंगजेब हा क्रूर शासक होता. औरंगजेबाने स्वत:च्या वडिलांना जेलमध्ये टाकले. तसेच औरंगजेब हा नेहमी धर्माचा आधार घ्यायचा. औरंगजेब हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीस हे देखील तेवढेच क्रूर आहेत. ते देखील कायम धर्माचा आधार घेतात. त्यामुळे दुर्देवाने औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार हा सारखाच आहे, असे विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केले होते.